कायदेपंडित, सुधारक, प्राच्यविद्या संशोधक, मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1850 रोजी मुंबई येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. गोव्याहून सुरुवातीस मुंबईस चरितार्थासाठी जी दहा-बारा सारस्वत घराणी आली त्यांपैकी त्यांचे एक घराणे. त्यांच्या वडिलांचे नाव बापूभाई. त्र्यंबकराव या थोरल्या चुलत्यांना मूल नसल्यामुळे त्यांनी काशिनाथ यांना दत्तक घेतले.
काशिनाथ यांचे शिक्षण मुंबईतच झाले. शालेय जीवनातच त्यांना मराठी कवितेची गोडी लागली. शाळेत इंग्रजी व संस्कृत हे दोन विषय त्यांचे उत्तम होते. त्यांची हुशारी पाहून मुख्याध्यापक एडमंड बर्क यांनी काशिनाथ यांना इंग्रजी तिसरीतून एकदम पाचवीच्या वर्गात पाठविले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ते मॅट्रिक झाले. त्यानंतर पुढील शिक्षणाकरिता त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. वर्ष 1868 मध्ये ते बीए झाले. 1869च्या शेवटी ते एमए झाले. एमए करता करताच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. ते वयाच्या 19 व्या वर्षी एमए, एलएलबी झाले.
पुढे ते एल्फिस्टन महाविद्यालयात अधिछात्र होते. त्यांचा विवाह भैरवनाथ कानविंदे यांच्या कन्या पुतळाबेन (अन्नपूर्णाबाई) यांच्याशी झाला.नंतर त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. पुढे 1889 मध्ये उच्च न्यायालयात त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. हिंदू कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला. संमतीवयाच्या कायद्यास त्यांची मान्यता होती. मुंबईला प्रदेश कॉंग्रेसचे ते संस्थापक तसेच 1885-89 पर्यंत चिटणीस होते. 1892 साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.
कायद्याप्रमाणेच इतिहास, राज्यशास्त्र, भाषासाहित्य या विषयांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व मिळवले होते तसेच फ्रेंच, जर्मन या भाषाही त्यांना अवगत होत्या. भाषा संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. आद्य शंकराचार्य हे पश्चिम मगधचा राजा पूर्ववर्मा याच्या कारकिर्दीत होऊन (इ. स. 590) गेल्याचे त्यांनी सिद्ध केले.
डॉ. वेबर यांनी रामायण-काळासंबंधीचा मांडलेला सिद्धान्त तसेच लेरिंगेर याचे गीतेसंबंधीचे प्रतिपादन त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने चुकीचे असल्याचे दाखवून दिले होते. ते सुधारणावादी असल्याने स्त्रीशिक्षण, विधवाविवाह इत्यादी सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते. त्या दृष्टीने त्यांनी हिंदू कायद्यात सुधारणा केल्या. ईल्बर्ट बिलाविरुद्ध युरोपियन लोकांनी केलेल्या चळवळीस तय्यबजी व फिरोझशहा यांच्याबरोबर त्यांनीही विरोध केला. अभ्यास, समाजकारण या बरोबरच त्यांनी लेखनही केले. इ. स. 1874 साली त्यांनी मुंबई सरकारसाठी भर्तृहरीची नीती आणि वैराग्य ही शतके एकत्र करून सटीप पुस्तक लिहिले.
इ. स. 1884 साली त्यांनी मुंबई सरकारसाठी विशाखदत्त यांच्या “मुद्राराक्षस’ या संस्कृत नाटकाची सटीप आवृत्ती लिहिली. त्यांना मातृभाषेचा फार अभिमान होता. त्यांनी स्थानिक राज्यव्यवस्था व शहाणा नेथन अशी दोन पुस्तके मराठीत लिहिली. 1 सप्टेंबर 1893 रोजी त्यांचे निधन झाले.