या महाराष्ट्राच्या भूमीत शिमग्याच्या कितीतरी आधीपासून जी धुळवड चालू आहे, तिच्या धुरळ्यात मराठी माणसाचा चेहराच हरवलाय. तो सभ्य, सुसंस्कृत चेहरा परत दे रं महाराजा… एकानं दुसऱ्याला आव्हान द्यायचं आणि दुसऱ्यानं पहिल्याला प्रतिआव्हान द्यायचं… पुढे काहीच होत नाही.
एकानं इशारा द्यायचा आणि दुसऱ्यानं धमकी द्यायची… पुढे काहीच होत नाही. कुणी म्हणतं, “इलाका तुमचा, धमाका आमचा’ तर कुणी म्हणतं, “तुमच्या गावात येऊन बारा वाजवेन’! यातली “धमकी’ कुठली आणि “सडेतोड प्रत्युत्तर’ कुठलं, हे कसं ओळखायचं महाराजा? हलक्या आणि शेलक्या शब्दांतली भांडणं थांबता थांबत नाहीत. आरोपाच्या पाचवीलाच प्रत्यारोप पुजलाय. कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं, हे समजेनासं झालंय. एवढंच कशाला… कुठले शब्द संसदीय आणि कुठले असंसदीय, हेही समजत नाहीये हल्ली. किंबहुना कुठला शब्द कुणी उच्चारला तर योग्य ठरतो आणि कुणाच्या तोंडी असंस्कृत ठरतो, याचा अंदाज ऐन मराठी पंधरवड्यात लागेनासा झालाय. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारी आमची मायमराठी आम्हाला परत दे रं महाराजा…!
उत्तम शेती “कनिष्ठ’ झाली, शेतकऱ्याची परवड झाली. पाहिजे तेव्हा पाऊस नाही, नको तेव्हा हमखास येतो. कधी पूर, कधी दुष्काळ, कधी गारपीट होते. त्यातून जगलं-वाचलं पीक, तर जंगली जनावरं नासाडी करतात. कच्च्या घरांमधून बळीराजाचे कच्चे-बच्चे वाघा-बिबट्याची भीती पोटात घेऊन झोपतात. बायाबापड्या हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करतात. तरीही बळीराजा कणा ताठ ठेवून शिवार फुलवतोच आहे. प्रतिकूलतेशी झगडतोच आहे. पण उपयोग काय? कांद्याला रद्दीचाही भाव मिळेना, कापूस घरात साठवून शेतकऱ्याला त्वचारोग जडला, फळबागांवरून नांगर फिरला, सोयाबीनचाही कचरा झाला…
पीक उभं असेपर्यंत भाव तेजीत आणि कापणी झाली की मार्केट डाऊन, हा दरवर्षी रडवणारा अनुभव कायमचा इतिहासजमा होईल, असं काहीतरी कर महाराजा..! यात्रा-जत्रांमधला “विरंगुळा’ म्हणून बैलगाडा शर्यती सुरू झाल्यात; पण कुठे बैलगाडी वेगात खांबावर आदळून अपघात होतोय तर कुठे बैलांसकट गाडी नदीत जाऊन कोसळतीये. शहरातला “विरंगुळा’ तर बघायलाच नको! गल्लीबोळांमधल्या कुणाच्याही वाढदिवसाचं निमित्त शोधून कानाचे पडदे फाडणारी डीजे-डॉल्बी, दारूचा महापूर आणि केक कापताना नाचणाऱ्या तलवारी अन् कोयते… परंपरा आणि “इव्हेन्ट’ यातला फरक आम्हाला कळेल, असं काहीतरी कर महाराजा!
ज्या वयात हातात वह्या-पुस्तकं आणि डोळ्यात भविष्याची स्वप्नं असायला हवीत, त्या वयात पोरासोरांच्या हातात गावठी कट्टे आणि डोळ्यात खुन्नस दिसू लागलीये. वीतभर मोबाइलमधल्या व्हर्च्युअल जंगलात पोरं हरवून जाऊ लागलीयेत. सोशल मीडियावरचे “लाइक्स’ म्हणजे व्यवहारात न चालणारी खोटी नाणी, हे समजण्याचं शहाणपण आम्हाला दे महाराजा… आमच्यात वाढत चाललेला खोटारडेपणा, एकमेकांबद्दलचा आकस, द्वेषभाव होळीच्या आगीत जळून जाऊ दे आणि त्याच आगीत तावून-सुलाखून आमचं अस्सलपण उजळू दे महाराजा..!