भारतीय जनता पक्षाच्या वाचाळ प्रवक्त्यांकडून धार्मिक तेढ आणि उन्माद निर्माण करण्याच्या सततच्या प्रयत्नांमुळे भारताला सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नामुष्कीच्या स्थितीला सामोरे जावे लागले आहे. भाजपच्या नुपूर शर्मा नावाच्या एका महिला प्रवक्त्याने एका टीव्ही चर्चेत अत्यंत बेजबाबदार मुक्ताफळे उधळली. त्याची परिणती कानपूर आणि अन्य ठिकाणच्या दंगलींमध्ये झाली आणि त्या पाठोपाठ इस्लामिक देशांनी संघटितपणे भारताचा निषेध सुरू केला. अनेक देशांनी भारताच्या राजदूतांना पाचारण करून त्यांना याप्रकरणी जाब विचारला आणि भारत सरकारला एक नाहक नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने त्या दोन नेत्यांना पक्षातून काढून टाकून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाला आम्ही सर्वच धर्मांचा सन्मान करतो, या नेत्यांनी व्यक्त केलेली मते ही आमच्या पक्षाची मते नाहीत, पक्षाच्या संविधानाच्या विरोधात त्यांनी हे मतप्रदर्शन केल्याने त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकत आहोत, असे जाहीर करावे लागले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारताच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर भाजपला उशिराने हे शहाणपण सुचले आहे. आपल्याला आता रोखणारे कोणीच नाही अशी जेव्हा एखाद्या पक्षाची धारणा होते त्यावेळी मग त्यांच्या नेत्यांना असा बेलगामपणा सुचू लागतो. त्याचे परिणाम काय होतील याची ते फिकीर करीत नाहीत. आपल्या बेफाम वक्तव्याने देशालाही मान खाली घालण्याची वेळ उद्भवू शकते याचेही त्यांना भान राहात नाही. पण आज आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारताच्या संबंधात ज्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत त्या भारतासाठी खचितच शोभादायक नाहीत. भाजप प्रवक्त्यांनी इस्लामच्या संबंधात केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे भारताने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काही इस्लामिक देशांनी केली आहे.
भाजप प्रवक्त्यांच्या बेलगाम वक्तव्यांमुळे संपूर्ण भारत देशावर आंतरराष्ट्रीय समुदायापुढे माफी मागण्याची वेळ येणार असेल, तर त्या सारखे दुर्दैव नाही. देशातील विरोधी पक्षांनीही या प्रकरणी आता भाजपला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. भाजपच्या प्रवक्त्यांच्या बडबडीमुळे संपूर्ण देशाने माफी मागण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रथम भाजपने भारतातील लोकांची या प्रकरणी माफी मागितली पाहिजे, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घ्यायला सुरुवात केली आहे. कॉंग्रेस आणि तेलंगणा राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षांनी तशी अधिकृत मागणीही केली आहे. याचाच अर्थ आपल्या वाचाळवीरांच्या कृत्यांमुळे भाजप आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच देशाच्या पातळीवरही कोंडीत सापडला आहे. याचा भाजप नेत्यांच्या भविष्यातील वर्तवणुकीवर कितपत परिणाम होईल, हे ठामपणे सांगता येत नसले तरी भाजपला तोंडदेखलेपणाने का होईना आपल्या वादग्रस्त नेत्यांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई करावी लागली आहे. तथापि, हे एक निव्वळ ढोंग आहे, असे कॉंग्रेसला वाटते आहे.
नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद यांच्याविषयी अयोग्य उद्गार काढल्यानंतर कुवेत, कतार, इराण या देशांनी भारतीय राजदूताला पाचारण करून या उद्गाराबद्दल त्यांनी भारताकडे आपली तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. त्यांच्या पाठोपाठ सौदी अरेबिया आणि पाकिस्ताननेही या वक्तव्यांचा निषेध करीत भारताला काही खरीखोटी सुनावली आहे. काही अवधीतच इस्लामिक देशांच्या संघटनेनेही याची दखल घेत भारतात निर्माण झालेल्या इस्लामविरोधी मानसिकतेचा निषेध केला आहे. वास्तविक भारत हा सामाजिक सलोखा जपणारा देश आहे; पण भारतात अलीकडच्या काळात राजकारणाच्या अपरिहार्यतेतून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार वाढीला लागला आहे, ही दुर्दैवी बाब आहे. राजकारणातील वातावरण निर्मिती ही धार्मिक तेढ ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणावर आधारित ठेवली जात असल्याचे हे परिणाम आहेत. याला लगाम घालण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जे प्रयत्न करणे अपेक्षित होते ते त्यांच्याकडून केले जात नव्हते. याचाच अर्थ अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना त्यांच्याकडून फूसच दिली जात असल्याचे चित्र देशात निर्माण झाले होते. हे भारताच्या प्रतिमेलाही शोभादायक नव्हते. पण भारताच्या प्रतिमेची या लोकांनी कधीच तमा बाळगलेली दिसली नाही. पंतप्रधानांच्या पातळीवरही पक्षातल्या या वाचाळवीरांना कधी लगाम घालण्याचा प्रयत्न झाल्याचे जाणवले नाही.
देशाच्या अनेक भागात दंगली घडूनही त्याबद्दल साधी चिंता व्यक्त करणारे वक्तव्य पंतप्रधानांकडून का झाले नाही, अशी विचारणाही अनेक जणांनी केली. पण त्यावरही पंतप्रधानांनी मौन बाळगणेच पसंत केले होते. शीर्षस्थ नेत्यांच्या या भूमिकेमुळेच त्यांच्या पक्षातील नेत्यांची भीड चेपत गेली आणि ते वाहवत गेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडून झालेली आक्षेपार्ह वक्तव्ये म्हणजे भारत सरकारची भूमिका नसते हे जरी खरे मानले, तरी आपण सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहोत, आपल्याकडून केली जाणारी वक्तव्ये ही संपूर्ण सरकारचीच भूमिका असल्याचे मानले जाऊ शकते त्याचे तारतम्य तरी या लोकांनी ठेवणे अपेक्षित आहे. आज वृत्तवाहिन्यांवरील साऱ्या चर्चा आणि सोशल मीडियावरील मतमतांतरातून सामाजिक वातावरण खराबच होताना दिसत आहे. सद्भावना, सौहार्द, सलोखा या साऱ्या मूल्यांना तिलांजली दिली जात आहे. ही मूल्ये जपणारा नेभळट किंवा देशविरोधी समजला जाण्यापर्यंतही काही लोकांची मजल गेली आहे. संपूर्ण जगात भारताची आजवरची जी ओळख होती तीच पुसली जाऊ लागली आहे आणि ते हताशपणे पाहाण्याची वेळ देशावर आली आहे.
भारत हा जगातला एक महान मानवतावादी आणि शांततावादी देश आहे. धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सलोखा हा या देशाचा मूलभूत पाया आहे. भारताने कधीच कोणत्याही धर्माच्या बाबतीत भेदभावाची नीती अवलंबलेली नाही ही बाब भारतीय जनता पक्षाने यानिमित्त स्पष्टपणे मान्य केली आहे, त्यांची ही भूमिका स्वागतार्हच मानली पाहिजे. पण हे वक्तव्य केवळ डॅमेज कंट्रोलचा भाग नाही तर ती आपण मनापासून स्वीकारलेली भूमिका आहे हे यापुढील काळात भाजपला पटवून द्यावे लागणार आहे. नुपूर शर्मा किंवा नवीन जिंदाल ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. भाजपमध्ये प्रदेश पातळीपर्यंत असे अनेक वाचाळवीर आहेत. त्यांनाही या घटनेपासून धडा घ्यावा लागेल. आपण टीव्ही मीडियापुढे जे बोलतो त्याचे तत्काळ आणि थेट पडसाद समाजात उमटत असतात याचेही भान त्यांना यापुढे राखावे लागेल. कानपूरच्या दंगलींचाही हाच धडा आहे.