आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, हे लक्षात आल्यामुळे सचिन पायलट यांनी वास्तवाचे भान ठेवत, पक्षकार्याला वाहून घेतल्याचे दिसते.
कॉंग्रेसची “भारत जोडो यात्रा’ डिसेंबर महिन्यात राजस्थानात होती आणि त्यावेळी यात्रेपेक्षा मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांच्यातील मतभेदांचीच अधिक चर्चा झाली. 2023च्या विधानसभा निवडणुकीसाठी केवळ एका वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने आमदारांशी चर्चा करून पायलट यांना मुख्यमंत्रिपदी बसवावे, अशी जाहीर मागणी पक्षाचे नेते व माजी आमदार सरोज मीना यांनी मागील महिन्यात केली होती. आता पायलट यांना मुख्यमंत्री करायला हवे होते, असा सूर अनेक कॉंग्रेस नेते आळवत आहेत.
पायलट यांनी यापूर्वी बंड केले होते. परंतु ते अयशस्वी ठरले. त्यांच्याकडे पुरेसे आमदार नाहीत, हे लक्षात आल्यावर भाजपनेही त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आणि या बंडामागे महाशक्तीचा संबंध असल्याचा आरोप खोटा असल्याचा पवित्रा धारण केला. त्यानंतर पायलट शांत झाले आणि गेल्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी सोनिया, राहुल व प्रियांका गांधी यांची भेट घेऊन, आगामी निवडणुकीपूर्वी किमान दीड वर्षे अगोदर मला मुख्यमंत्री केले तर मी रिझल्ट देऊ शकेल, असे सांगितले. पायलट यांची अस्वस्थता लक्षात घेऊन, कॉंग्रेस श्रेष्ठींनी एक फॉर्म्युला तयार केला. त्यानुसार, गेहलोत यांना कॉंग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष करून पायलट यांना मुख्यमंत्री करायचे, असे ठरले. मग मल्लिकार्जुन खर्गे व अजय माकन यांना जयपूरमध्ये निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले. कोणाला किती पाठिंबा आहे, हे आजमावण्याचे नाटक करून त्यानंतर श्रेष्ठींनीच आपल्याला हवा तसा निर्णय घ्यायचा ही कॉंग्रेसची पद्धतच आहे. परंतु त्यावेळी गेहलोत यांनी शक्तिप्रदर्शन करून, श्रेष्ठींना एकप्रकारे इशाराच दिला.
कॉंग्रेस श्रेष्ठींचा दबदबा शिल्लक न राहिल्यामुळे गेहलोत यांच्यापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. गेल्या आठवड्यात पायलट यांनी राज्याची यात्रा आरंभली आणि नागौर या जाटबहुल प्रदेशातून यात्रेला सुरुवात केली. त्याना तेथे तुफान प्रतिसाद मिळाला, तसेच हनुमानगढ, झुनझुनू आणि पाली येथील त्यांच्या किसान संमेलनास जनतेने मोठ्या संख्येत हजेरी लावली. दलित कुटुंबात जाऊन चहापान करणे, मुस्लीम नेत्यांबरोबर भोजन, असे करत विविध समाजघटकांना पायलट यांनी जोडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा आक्रमक प्रचार लक्षात घेता, आपल्याला वेळ दवडता येणार नाही याचे भान त्यांना आहे, ही चांगलीच बाब आहे.
सचिन पायलट हे तरुण व तडफदार नेते असून, शेतकऱ्यांमध्ये तसेच शहरी भागातही त्यांना अपील आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले असल्यामुळे तसेच उपमुख्यमंत्री राहिल्यामुळे त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. पायलट यांचे भाषण आकर्षक असते. भाजप सतत हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान, मंदिर-मशीद याबद्दल बोलत असतो. पण “मुझसे ज्यादा राम राम सा कौन बोलता है?’ असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला, तेव्हा नागौरच्या जनतेने टाळ्यांचा एकच कडकडाट केला. राजस्थानात लोक एकमेकांना “राम राम सा’ करत असतात.
पायलट हे आपल्या भाषणातून तरुणांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतात. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा फायदा उठवत तरुण कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसची पक्षबांधणी करावी, असे आवाहन ते करत असतात. विशेष म्हणजे, गेहलोत सरकारवरही ते थेटपणे कधी कधी टीका करतात. राजस्थानातील पेपरफुटी प्रकरणी छोट्या माशांऐवजी मोठ्या माशांना पकडा, असे आवाहनही ते करतात. पायलट यांच्या सभांना व कार्यक्रमांना तरुण-तरुणींची गर्दी होत आहे, हे लक्षणीय मानावे लागेल. मागच्या वेळी कॉंग्रेसला जे यश मिळाले होते, त्यामागे पायलट यांनी पाच वर्षे प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेले परिश्रमच कारणीभूत होते. परंतु त्याचे फळ त्यांना मिळाले नाही. उलट गेली पाच वर्षे गेहलोत हे त्यांना सतत हिणवत असतात. उपमुख्यमंत्रिपदही पायलट यांना लवकरच सोडावे लागले होते आणि आज तर त्यांच्याकडे कोणतेही पद नाही. ते केवळ कॉंग्रेस आमदार आहेत. त्यांच्या यात्रेस होणाऱ्या गर्दीमुळे गेहलोत अस्वस्थ असतील, यात शंका नाही.
दुसरीकडे, पुढील निवडणुकीत पायलट यांना “भावी मुख्यमंत्री’ म्हणून प्रोजेक्ट केले, तरच कॉंग्रेसला विजय मिळण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे. तसेच गेहलोत यांनी स्वतःहून माघार घेऊन पायलट यांच्यामागे आपली ताकद उभी केली, तर ते कॉंग्रेसच्या दृष्टीने हिताचे ठरेल. परंतु पायलट यांच्याशिवाय कोणीही चालेल, अशी गेहलोत यांची भूमिका आहे. वास्तविक चिरंजीवी वैद्यकीय विमा योजना, शहरांमध्ये मनरेगा, वयोवृद्धांना निवृत्ती वेतन आणि 12 लाख शेतकऱ्यांना वीजसवलत या कल्याणकारी उपक्रमांमुळे अँटि-इनकम्बन्सीची लाट थोपवण्यात कॉंग्रेसला यश मिळू शकते. परंतु कॉंग्रेसच्या अनेक आमदारांबद्दल त्या त्या मतदारसंघांतील जनतेचा रोष आहे.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्दू यांच्यातील भांडणामुळे कॉंग्रेसची सत्ता गेली. परंतु यामुळे कोणताही बोध न घेता, अजूनही पायलट यांचा उल्लेख गेहलोत हे “गद्दार’ असा करत मतभेदांचे जाहीर प्रदर्शन करत आहेत. पायलट आणि गेहलोत यांच्यातील मतभेद दूर करून कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून देण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष खर्गे यांचीही आहे. भारत जोडो यात्रेमुळे एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राजस्थानमधील भाजपमध्ये प्रचंड गटबाजी असून, वसुंधराराजे शिंदे नाराज आहेत. म्हणूनच मिळालेल्या संधीचे सोने करायचे की नाही, हे आता कॉंग्रेसवरच अवलंबून आहे.