सीमा प्रश्नांत आता नकाशांची फडफड
बंगळूर, ता. 15 – मुंबई राज्याला कोणते प्रदेश द्यावयास म्हैसूर तयार आहे व म्हैसूरला मुंबईचे कोणते प्रदेश हवे आहेत याविषयीचे नकाशे आणि तक्ते म्हैसूर सरकार गृहमंत्री श्री. पंत यांना पुढील महिन्यात सादर करील असे म्हैसूर प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष एच. के. वरिनगौडा यांनी आज येथे सांगितले.
मुंबई सरकारने निपाणी, बेळगाव आदि 600 गावांवर हक्क शाबिती दाखविणारे नकाशे सादर केले आहेत. त्याचप्रमाणे 125 खेडी म्हैसूरला देण्यात येतील अशा साठीही नकाशे सादर केले आहे.
तुर्भेची मोठी अणुभट्टी 1960 मध्ये चालू होईल
नवी दिल्ली – कॅनडा-भारत अणुभट्टी 1960च्या सुरुवातीला चालू होईल असे पंतप्रधान श्री. नेहरू यांनी आज राम साहाय्य यांच्या प्रश्नास उत्तर देताना सांगितले. अणुभट्टीच्या उभारणीचे काम चालू करू असे सांगून ते म्हणाले की, ही अणुभट्टी बरीच मोठी आहे. ती पुरी झाली की, वैद्यकीय व इतर क्षेत्रातील संशोधनास त्याची बरीच मदत होणार आहे.
तिसऱ्या योजनेमध्ये छोट्या उद्योगावर भर
अहमदाबाद – “भरपूर लोकांना रोजगार देऊ शकतील अशा छोट्या उद्योगधंद्यावरच तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत भर द्यावा लागेल’, असे मध्यवर्ती व्यापार व उद्योग खात्याचे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी गुजरात विद्यापीठाच्या समाज विज्ञान विद्यालयात भाषण करताना सांगितले.
ते म्हणाले की, मी मोठे उद्योग, मोठ्या पाटबंधारे योजना किंवा यंत्रचलित कारखान्यांच्या विरुद्ध नाही पण तिसऱ्या योजनेकडे देशातील गरजांच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. म्हणून छोटे उद्योग व पारंपरिक पद्धतीने पाट-पाण्याची सोय करणे यावरच भर हवा.
जागतिक सनदेची दुरुस्ती करायला योग्य वेळ नाही
नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या सनदेची दुरुस्ती करण्याचा तूर्त प्रयत्न केल्यास बड्या राष्ट्रांत मोठाच झगडा होईल कारण त्यांना इतर गोष्टींबद्दल स्वार्थी आस्था असून त्याची छाया सनद दुरुस्तीच्या प्रश्नावर पडल्याशिवाय राहणार नाही, असे राम साहाय्य यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नेहरू यांनी आज राज्यसभेत सांगितले.