-डॉ. अभय टिळक
ज्ञानोबारायांच्या समाधीप्रसंगाचे वर्णन करणाऱ्या एका अभंगामध्ये, “भक्ती केली ख्यात ज्ञानदेवें’ असे गौरवोद्गार नामदेवराय काढतात. भक्ती ही संकल्पना तर अनादी काळापासून आहे.
मग, ज्ञानदेवांनी भक्ती विख्यात बनविली, असे नामदेवराय का म्हणतात? की, आपण ज्याला भक्ती म्हणतो तो व्यवहार आणि ज्ञानोबारायांना व नामदेवरायांना अभिप्रेत असणारा भक्तीचा व्यवहार यात काही फरक आहे?
या प्रश्नाचे उत्तर ज्ञानोबारायांनीच- “जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्यातें परौते सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ।।’ या ज्ञानदेवांच्या नवव्या अध्यायातील ओवीमध्ये दिला आहे.
ज्या भक्तीद्वारे नीतीचे मूर्तिमंत दर्शन घडते अशी भक्ती ज्ञानदेवांनी त्यांच्या जीवनाद्वारे विख्यात बनविली, असा नामदेवरायांचा सांगावा आहे. आपण जी भक्ती करतो तिला नीतीचे अस्तर असते का? अशा नीतीमय भक्तीचा पुरस्कार भागवत धर्म करतो.