कालवापाणी करारावर सह्या करण्यासाठी पंतप्रधान पं. नेहरू पाकिस्तानला जाणार
लाहोर, ता. 28 – कालव्याच्या पाण्याचा करार पुरा झाल्यावर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी रावळपिंडीस जाऊन त्याच्यावर पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान यांच्याबरोबर सही करावी असे सुचविण्यात आले आहे.
आयुब खान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, पंडित नेहरू यांनी लाहोरला जावे ही सूचना भारतीय गोटातून आली आहे. ती मला स्वागतार्ह वाटते. अर्थातच ही भेट शिष्टाचाराच्या स्वरूपाचीच आहे. पालम विमानतळावर गेल्या सप्टेंबरमध्ये पंडित नेहरू-आयुब खान यांची भेट झाली तेव्हा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंडित नेहरूंना भेटीचे निमंत्रण दिले होते. पण त्यावेळी पंडित नेहरूंची फारशी अनुकूलता दिसली नाही. निव्वळ सह्यापेक्षा इतरही मुद्द्यांवर चर्चा या भेटीत झाली तर बरे असे आयुब खान यांचे मत आहे. पण भेट विफल झाली तर ते बरे नव्हे असेही त्यांना वाटते आहे.
कामगार कार्यकर्त्यांना व्यवसायाची पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे
मुंबई – कामगाराचा दृष्टिकोन घडविणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्योगधंद्यांची वाढ व विकास कसा होईल याची संपूर्ण माहिती देण्याची आवश्यकता आहे असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डी. जी. कर्वे यांनी सांगितले. मुंबई कामगार संस्थेच्या पदवीदान प्रसंगी ते भाषण करीत होते. ते पुढे म्हणाले, कामगार कल्याणविषयक अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. नियोजित अर्थघडीत महत्त्वाचे अधिकार बनणार आहेत अशांना शिक्षण देणाऱ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.
चौ एन लाय यांनी निमंत्रण स्वीकारल्यामुळे पंतप्रधान पं. नेहरू यांना आंनद व समाधान
नवी दिल्ली – चीनचे पंतप्रधान चौ एन लाय यांनी माझे भेटीचे निमंत्रण स्वीकारले याचे मी स्वागत करतो. एप्रिलमध्ये आमची भेट नक्की कधी होईल ते लवकरच ठरविण्यात येईल असे पंतप्रधान पं. नेहरू यांनी सांगितले.