पश्चिम पाक व पूर्व पाक यांना जोडणारी थेट रेल्वे पाकिस्तान सरकारला पाहिजे
रावळपिंडी, ता. 1 – पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान यांचे दरम्यान थेट रेल्वे वाहतूक सुरू करण्याबाबत पाक सरकार भारत सरकार बरोबर वाटाघाटी सुरू करणार आहे असे अधिकृतरित्या समजते. या वाटाघाटीसाठी पाकचे शिष्टमंडळ नेमण्यात आले असून त्यातील सदस्यांची नावे पाक मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. या वाटाघाटी केव्हा सुरू होतील याबाबत अद्याप समजले नाही.
फ्रान्सचा दुसरा अणुस्फोट प्रयोग
पॅरिस – फ्रेंच सरकारने आज सहारा वाळवंटात यशस्वीरीत्या अणुस्फोट प्रयोग केला. या स्फोटाचे वेळी त्या भागात जाण्यास विमानांना बंदी करण्यात आली होती. फ्रेंच सरकारने केलेला हा दुसरा अणुस्फोट आहे. पहिला अणुस्फोट 13 फेब्रुवारी रोजी करून पाहण्यात आला होता.
नेपाळच्या राजेसाहेबांनी भारताचे आभार मानले
खाटमांडू – नेपाळचे राजे महेंद्र यांनी भारताने नेपाळला दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल भारत सरकारचे आभार मानले आहेत. आज नेपाळी पार्लमेंटमध्ये उद्घाटनाचे भाषण त्यांनी केले. त्यावेळी त्यांनी भारताबरोबर रशिया व चीन या देशांचेही आभार मानले. चीन व नेपाळ यांच्यादरम्यान सरहद्द करार झाला आहे त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी आपल्या भाषणात केला नाही. मात्र वर्णपक्षपाताचा त्यांनी कडक शब्दांत निषेध केला.
गुजरातला वाटा देता तर म्हैसूरलाही मुंबईतील वाटा द्या
बंगलूरू – राज्य पूनर्रचनेपूर्वी मुंबई, मद्रास आणि हैदराबाद शहरांत म्हैसूर राज्याने जी मालमत्ता उभी केली त्यातील वाटा म्हैसूरला मिळण्याच्या दृष्टीने सरकारने उपाययोजना करावी असे म्हैसूरचे माजी मुख्यमंत्री हनुमंतय्या यांनी सुचविले. ते म्हणाले, योग्य वाटणी केली तर आम्हाला 20 कोटी रुपये मिळतील.