चिनी पंतप्रधानांच्या भेटीत भारत-चीन सीमा प्रश्न सोडविला जाईल
नानगल, ता. 2 – चौ एन लाय यांच्या दिल्ली भेटीच्या वेळी भारत-चीन सीमा तंटा मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल नव्हे मिटविला जाईल अशी मला आशा वाटते असे प्रे. नासर यांनी आज सांगितले. ते पुढे म्हणाले, आशियाई आणि आफ्रिका देशांतील सर्व तंटे शांततेच्या मार्गाने सोडवावयाचे असे बांडुंग परिषदेत ठरविण्यात आले होते. प्रत्येक देशात बांडुंगची ही भावना प्रभावी ठरावी असे मला वाटते.
बांडुंग भावना भारतात नाही की पाकमध्ये नाही या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी आज भारतात आहे. लवकरच पाकिस्तानात जाणार आहे. पाकिस्तानच्या राजवटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, सुऱ्हावादी राजवटीचा इजिप्तशी मित्रभाव नव्हता. इस्रायलने संयुक्त अरब गणराज्यावर स्वारी केल्यास आश्चर्य वाटणार नाही.
पहिल्या प्रतीचे वकीलच पहिल्या प्रतीचे न्यायाधीश बनतील – डॉ. राजेंद्रप्रसाद
नवी दिल्ली – अखिल भारतीय वकील वर्ग मंडळ (बार कौन्सिल) स्थापन झाले. त्याचे उद्घाटन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाले. हा समारंभ विज्ञानभवनात झाला. या प्रसंगी राष्ट्रपती म्हणाले, “देशातील वकील वर्ग पहिल्या प्रतीचा असेल तर देशाला न्यायाधीशही पहिल्या प्रतीचे मिळू शकतील.
भारतीय बनावटीची विजेची रेल्वे इंजिने
नवी दिल्ली – तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत दरमहिन्याला 5 विजेची रेल्वे इंजिने तयार करण्याची योजना नियोजन मंडळाने मंजूर केली आहे. पुढील वर्षी भारतीय बनावटीचे पहिले विजेचे रेल्वे इंजिन तयार होईल. हे इंजिनही चित्तरंजन कारखान्यातच तयार होणार. सध्या या कारखान्यात वाफेवर चालणारी रेल्वे इंजिने दरमहा 14 तयार होत असतात.