– माधव विव्दांस
मराठी कादंबरीकार नाथमाधव यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1882 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे नाव द्वारकानाथ माधव पितळे असे होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. एक खेळाडू विद्यार्थी म्हणून शालेय जीवनात ते चमकले. पुस्तकी शिक्षणाची त्यांना आवड नसल्याने मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कुलाब्यातल्या तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरी धरली.
नोकरीच्या निमित्ताने त्यांना खूप प्रवास करावा लागत असे. या वेळी त्यांना शिकारीचा छंद जडला. वर्ष 1905 मध्ये एकदा शिकार करायला गेले असताना एका उंच कड्यावरून ते खाली कोसळले आणि त्यांच्या कमरेखालील भाग जायबंदी झाला व लुळा पडला. त्यावेळी उपचारार्थ इस्पितळात असताना त्यांना वाचनाची आवड उत्पन्न झाली. या वाचनाच्या छंदातून त्यांनाही काहीतरी लिहावेसे वाटू लागले. सुरुवातीला इंग्रजीमधून त्यांनी काही लेख लिहिले व पुण्यातील एका इंग्रजी दैनिकातून प्रसिद्धही झाले.
एकदा धूतपापेश्वर आरोग्य मंदिराकडून देशी औषधोपचार करून घेण्यासाठी ते पनवेल येथे गेले असता तेथे प्रबोधनकार ठाकरे आणि केरळकोकिळकार कृ. ना. आठल्ये ह्यांचा सहवास त्यांना लाभला. पनवेल येथेच त्यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली. वर्ष 1908 मध्ये “प्रेमवेडा’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर नाथमाधवांनी आपल्या लेखनातून ऐतिहासिक सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबऱ्यांतून त्यांनी सामाजिक प्रश्नांची बोधप्रद अंगाने मांडणी करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी आपल्या 46 वर्षांच्या आयुष्यातील बराच काळ छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधनात घालवला. ठिकठिकाणी प्रवास करून ते ऐतिहासिक सामग्री मिळवीत तसेच इतिहासग्रंथांचे वाचन करीत. “स्वराज्यातील दुफळी’ ह्या कादंबरीमालेतून त्यांनी मराठेशाहीच्या उदयापासूनचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. वर्ष 1909 मध्ये “सावळ्या तांडेल’ ही त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी. यामध्ये शिवाजी महाराजांचे सामर्थ्यशाली आरमार आणि ते सांभाळणारे शूर तांडेल हा विषय होता. त्यांनी बालविवाहातून निर्माण होणाऱ्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते.
सामाजिक आशय असलेली “डॉक्टर’ ही त्यांची कादंबरी खूपच लोकप्रिय झाली. या कादंबरीमध्ये कमलिनी सुशिक्षित असल्यामुळे तिच्याबद्दल संशय घेऊन गैरसमज करून तिचा त्याग करणारा अशिक्षित नवरा त्यांनी दाखविला आहे. कमलिनी मात्र एम.डी. झाल्यानंतरही आपल्या पतीशी सौजन्याने वागून त्याच्या मनातील किल्मिष काढून टाकते. संसारामध्ये पतिपत्नीचे वर्तन कसे असावे याचे सुंदर मार्गदर्शन त्यांनी कथानकात मांडले आहे.
वर्ष 1959 मध्ये या कादंबरीवरून “शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला. त्यांच्या साहित्यसंपदेमध्ये त्यानंतर सामाजिक आणि ऐतिहासिक मिळून तीसहून अधिक कादंबऱ्यांचा समावेश आहे. नाथमाधव यांच्या “वीरधवल’ या कादंबरीचा प्रभाव आजही मराठी बालसाहित्यावर आहे. ही अजरामर साहित्यकृती कथाकथन स्वरूपात श्रोत्यांसाठी आणली आहे आणि त्यास भारदस्त आवाज लाभला आहे, अभिनेता हरीश कुलकर्णी यांचा. मुंबई येथे 21 जून 1928 रोजी त्यांचे निधन झाले.