– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त । परी तें कर्मफळ निश्चित । वोळख तूं ।।72।। वांचूनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक। एथ कर्मचि फळसूचक। मनुष्यलोकीं ।।73।। जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ।।74।।
माऊली म्हणतात या इहलोकांत फलाच्या अपेक्षेनुसार ज्याला जी इष्ट वाटेल त्या देवतांची यथायोग्य उपासना करतात. त्या उपासकांच्या मनात जी जी फले अपेक्षित असतात ती ती सर्व त्यांना प्राप्त होतात. तरीपण हे सर्वस्वी प्रत्येकाने केलेल्या कर्माचे फळ आहे; हे लक्षात घेणे अतिमहत्त्वाचे आहे.
म्हणून या कर्मप्रकरणात कर्मावाचून फल देणारे आणि कर्म कर्मकर्त्यावाचून फल घेणारे दुसरे कोणतेही योग्य कारण उपलब्ध नाही. म्हणून या मनुष्यलोकामध्ये कर्म असेल तर फल, नसेल तर नाही.
म्हणजेच कर्म हेच सूचक म्हणजे फल साधक आहे; हे निभ्रांतपणे सिद्ध होते. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे तेच उगवते; दुसरे काही उगवतच नाही किंवा जे आरशात पाहावे तेच आरशात प्रतिबिंबीत होते.