जागतिक शांततेच्या प्रश्नास वेगळे महत्त्व
नवी दिल्ली, दि. 4 – सध्याची आंतरराष्ट्रीय संबंधातील तणावाची परिस्थिती लक्षात घेता जागतिक शांतता टिकविण्याच्या प्रश्नास वेगळे महत्त्व आले आहे, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण व तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केले. चव्हाण यांच्या 5 दिवसांच्या तुर्कस्तान भेटीनंतर हे मत व्यक्त करण्यात आले. आशियातील परिस्थितीवरही या दोघांनी चर्चा केली. तुर्कस्तान प्रजासत्ताकचे अध्यक्ष फहरी एस कोरुटर्क यांना दिलेले भारत भेटीचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे.
88 हजार भू-हीन कुटुंबांना फायदा
नवी दिल्ली – भू-मर्यादा कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे आतापर्यंत सुमारे 88 हजार कुटुंबांना फायदा झाला. या कायद्यानुसार 3,33,000 हेक्टर जमिनीचे वाटप करण्यासाठी ताब्यात घेण्यात आली. आतापर्यंत 48000 हेक्टर जमीन भू-हीनांना वाटण्यात आली. जमीन कसण्यासाठी केंद्र सरकार सहाय्य करीत आहे.
नागपुरात कोळशाचा प्रचंड साठा
नागपूर – येथून 35 किमी अंतरावरून वाहणाऱ्या “आम’ नदीचे पात्र वळवून कोळशाचा मोठा साठा मिळणार आहे.