सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर राहील
नवी दिल्ली, दि. 23 – ग्रामीण जनतेला निर्णय घेण्यात भाग घेता यावा व आपली योजना करता यावी म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात येईल. जनता पक्षाच्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा प्रमुख असेल, असे सर्वोदयवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी सांगितले.
न्यायालये व वृत्तपत्रे यासारख्या स्वतंत्र संस्थांची शक्ती पुन्हा वाढविण्याचा हा पक्ष प्रयत्न करील. सामाजिक-आर्थिक कार्यक्रम हा गांधीजींच्या तत्त्वावर आधारित राहील.
हुंडा घेणार नाही आणि देणार नाही
जगदाळपूर – एक लक्ष तरुण-तरुणींनी हुंडा न घेण्याची प्रतिज्ञा घेतली असून, ती प्रतिज्ञा पत्रके आज संजय गांधी यांना देण्यात आली. तसेच युवक कॉंग्रेसकडे 25 हजार नेत्रदानाची यादी तयार आहे.
गंगा पाणी वाटप करार नाही
नवी दिल्ली – गंगा पाणी वाटप प्रश्नावरील मंत्री स्तरावरील चर्चा कोणताही करार न होता संपली. उभय बाजूंनी प्रयत्न केले पण करार झाला नाही. भारत-बांगलादेश मंत्री स्तरावरील ही चर्चेची तिसरी फेरी होती.