प्रबोधनकार, संपादक, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, विचारवंत, लेखक, मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष मे. पुं. रेगे तथा मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा आज जन्मदिन.
त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे 24 जानेवारी 1924 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथील नगरपालिका शाळेत झाले. त्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण पार्ले टिळक विद्यालय व किंग जॉर्ज हायस्कूल, मुंबई येथे पार पडले. त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. वर्ष 1946 मध्ये नवसारी येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर सुरत, मिलिंद विद्यालय औरंगाबाद, कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथे प्राचार्य, अशी 33 वर्षे अध्यापन केले.
वर्ष 1959-1960 या कालावधीमधे ब्रिटिश काउन्सिलची स्कॉलरशीप मिळून ते एका वर्षासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले. या वर्षभराच्या काळात तेथे त्यांनी गिल्बर्ट राइल, जे. एल. ऑस्टिन, ए. जे. एयर, मायकेल डमेट, पी. एफ. स्ट्रॉसन या विद्वानांची व्याख्याने ऐकली, तसेच तर्कशास्त्राचे सखोल अध्ययन केले. 1979-81 दरम्यान जी. डी. पारीख संशोधन केंद्र, मुंबई तसेच वर्ष 1981-84 या कालावधीमधे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे येथे संचालक म्हणून काम पाहिले. वर्ष 1984 पासून वाई येथील प्राज्ञ पाठशाळेच्या धर्मकोश व शासनाच्या विश्वकोश कार्यालयात संपादकीय काम करीत होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांच्या पश्चात 4 जून 1994 ते 28 डिसेंबर 2000 या कालावधीमध्ये वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. मात्र, शास्त्रीबुवांच्या खुर्चीवर ते कधीही बसले नाहीत.
त्यांनी मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये लेखन केले. त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञान व परंपरेची आपल्या लेखनातून ओळख करून दिली. “पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’, “तत्त्वज्ञानातील समस्या’ ही भाषांतरे, “नवभारत (मासिक)’ मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्यांच्या नोंदी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांनी वर्ष 1984-1998 या कालावधीमध्ये “नवभारत’ आणि वर्ष 1981 ते 2000 या कालावधीमध्ये “क्विस्ट’ या मासिकांचेही संपादन केले.
त्यांनी तत्त्वज्ञानातील समस्या-मूळ लेखक : बर्नांड रसेल, पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास- मूळ लेखक : मॅकेन्झी यांची पुस्तके भाषांतरित केली. त्यामुळे पाश्चात्त्य लेखकांचा दृष्टिकोन मराठी अभ्यासकांना माहिती झाला. तत्त्वज्ञानाबरोबरच तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र, धर्म, भाषा, साहित्य इत्यादी विषयांमध्येही अभ्यास होता. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये काम करीत असताना त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संपर्क आला. साहजिकच त्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाविषयी व दलितांच्या समस्यांविषयी जाणीव झाली. 28 डिसेंबर 2000 रोजी त्यांचे निधन झाले.