आणीबाणीचे नियम शिथिल करण्यात येणार
नवी दिल्ली, दि. 19 – न्याय्य राजकीय हालचालींना मुभा देण्यासाठी आणीबाणीचे नियम शिथिल करण्यात येतील, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.
त्या पुढे म्हणाल्या, गोंधळ व बेशिस्तीच्या जुन्या दिवसांकडे पुन्हा जायचे नाही. भारतीय पत्रकारिता दीर्घकाळापासून पक्षीय राजकारणाशी संलग्न राहिली आहे. त्यामुळे देशातील परिस्थितीचे अयोग्य मूल्यमापन होते. पत्रकारास दोन भूमिका कराव्या लागतात. प्रथम नागरिक म्हणून व नंतर पत्रकार म्हणून असा आपला दृष्टिकोन असावा. नवे विचार व कल्पना यांचा जनतेत प्रचार करण्याचे महत्त्वाचे काम वृत्तपत्रे करू शकतात.
कुंभमेळ्यासाठी दोन कोटी यात्रेकरू
कुंभनगर – येथील यात्रेकरूंची एकूण संख्या आज सुमारे 2 कोटी इतकी होती! इतकी प्रचंड गर्दी आतापर्यंत कधीही झाली नव्हती. आज मौनी अमावास्येच्या मुहूर्तावर त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी पावसाला न जुमानता वाळूतून, चिखलातून लोकांची प्रचंड झुंबड उडाली होती. शृंगरी, बद्री, द्वारका व पुरी या चारही पीठांचे शंकराचार्य आज येथे उपस्थित होते. द्वारकापीठाचे शंकराचार्य म्हणाले की, असे चारहीजण गेल्या अनेक शतकांत एकत्र आलेले नव्हते!
किनारा संरक्षक संघटना स्थापणार
नवी दिल्ली – भारत सरकार किनारा संरक्षक संघटना स्थापन करणार आहे. या संघटनेच्या उभारणीसाठी योजना तयार केली जात आहे.