-प्रा. अविनाश कोल्हे
जम्म-काश्मीरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकांचे निकाल पाहता या नव्या निर्माण केलेल्या केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा राज्याचा दर्जा मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याचा दर्जा कमी करून जम्मू-काश्मीरचा एक केंद्रशासित प्रदेश आणि लडाखचा दुसरा केंद्रशासित प्रदेश असे दोन केंद्र शासित प्रदेश निर्माण केले होते. तेव्हापासून या भागात प्रचंड अस्वस्थतता होती. हा निर्णय जम्मू-काश्मीरच्या जनतेला मान्य नाही, या निर्णयाविरुद्ध संधी मिळताच जनता रोष व्यक्त करेल वगैरे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. केंद्र सरकारने ऑगस्ट 2019चा निर्णय जाहीर केल्यापासून जवळपास सर्व विरोधी पक्षनेत्यांना एक तर तुरूंगात टाकले होते किंवा नजरकैदेत ठेवले होते.
या संदर्भात जम्मू काश्मीरमध्ये शांततेत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) कडे बघितले पाहिजे. या निवडणुकांत खरी लढत भाजपा आणि गुपकार आघाडीत होती. गुपकार आघाडीत सात पक्ष आहेत. एकूण 280 जागांवर निवडणूक झाली होती. त्यापैकी 278 जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत. एकूण वीस जिल्ह्यांपैकी सहा जिल्हे भाजपाने, चार जिल्हे कॉंग्रेस आणि नऊ जिल्हे गुपकार आघाडीने जिंकले आहेत. श्रीनगर जिल्ह्यात अपक्षांचा वरचश्मा आहे. या जिल्ह्यात भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही.
या संदर्भात आधी जम्मू-काश्मीरचा भूगोल समजून घेतला पाहिजे. ऑगस्ट 2019 पूर्वी या राज्याचे तीन पूर्ण वेगवेगळे भाग होते. काश्मीर खोरे हा भाग पाकिस्तानच्या सीमारेषेपासून जवळ आहे. या भागात जवळजवळ 90 टक्के लोकसंख्या मुस्लीम धर्मीय आहे. जम्मू हा भाग भौगोलिक पातळीवर भारताच्या जवळ असून येथे जवळजवळ 70 टक्के हिंदू धर्मीय आहेत. लडाख हा भाग चीनच्या सीमेपासून जवळ असून येथे जवळजवळ 80 टक्के बौद्ध धर्मीय आहेत. असे धार्मिक वैविध्य असलेले हे एकमेव राज्य आहे. या धार्मिक वैविध्याचे प्रतिबिंब निवडणुकांच्या निकालात पडणे अपरिहार्य आहे.
काश्मीर खोऱ्यात गुपकार आघाडीने 72 जागा जिंकल्या आणि कॉंग्रेसने नऊ तर भाजपाने अवघ्या तीन जागा. जम्मू भागात भाजपाने 71 जागा जिंकल्या, गुपकार आघाडीने 35 तर कॉंग्रेसने 17 जागा जिंकल्या. जम्मू-काश्मीर पंचायती राज कायदा 1989 मध्ये ऑक्टोबर महिन्यात दुरूस्ती केली होती आणि त्यानुसार या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. या नव्या दुरूस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात चौदा मतदार संघ निर्माण झाले. या सर्व जागा थेट निवडणुकांद्वारे भरल्या. आता निवडून आलेले सभासद त्यांच्यापैकी एकाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडतील.
भाजपासाठी या निवडणुका फार प्रतिष्ठेच्या होत्या. ऑगस्ट 2019 मध्ये घेतलेल्या निर्णयानंतर प्रथमच तेथील जनतेला मतदान करण्याची संधी मिळत होती. याचा दुसरा अर्थ असा की कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य, यावर या निवडणुकांत जनमत व्यक्त होणार होते. या निवडणुका म्हणजे एक प्रकारचे सार्वमत होते.
लवकरच राज्यात निवडणुका होतील याचा अंदाज आल्यामुळे तेथील विरोधी पक्ष एक झाले आणि ऑक्टोबर 2020 मध्ये श्रीनगर येथे अकरा छोटेमोठे पक्ष एकत्र येऊन “पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन’ ही संघटना स्थापन केली. याचे अध्यक्ष म्हणून नॅशनल कॉन्फरंसचे अध्यक्ष डॉ.फारूख अब्दुल्ला यांची निवड करण्यात आली असून पीपीडीच्या प्रमुख श्रीमती मेहबूबा मुफ्ती यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अशा आघाडीनंतर जशी वादावादी होते तशीच गुपकारमध्येही झाली. सरते शेवटी आघाडीत सात पक्ष उरले.
गेले अनेक महिने तेथील महत्त्वाचे नेते गजाआड होते. जानेवारी 2020 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये एक नवा प्रादेशिक पक्ष स्थापन झाला. “जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ हे या पक्षाचे नाव. या पक्षाच्या नेत्यांनी नंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तेव्हा मोदींनी आश्वासन दिले की जम्मू-काश्मीरचा “राज्य’ हा दर्जा लवकरात लवकर परत दिला जाईल. या बातमींमुळे 5 ऑगस्ट 2019 पासून नाराज असलेल्या जम्मू-काश्मीरमधील जनतेत आनंदाची लाट उसळली होती.
हा नवा पक्ष स्थापन करण्यामागे भाजपाचा हात आहे, असे आरोप झाले होते. या पक्षाद्वारे भाजपा राज्यातील जनतेशी संवाद साधू बघत असल्याचे बोलले जात होते. आता याच अपनी पार्टीवर ओमर अब्दुल्ला यांनी आरोप केले आहेत की नव्याने निवडून आलेल्यांना विकत घेण्यासाठी या पक्षाचा वापर केला जात आहे.
यातील पक्षीय राजकारणाचा भाग वगळला तरी या निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. यामुळे ऑगस्ट 2019 पासून घुसमट होत असलेल्या जनतेला व्यक्त होण्याची संधी मिळाली. या निवडणुकांत 51 टक्के मतदान झाले हेही लक्षात घेतले पाहिजे. यामुळे आता जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया गतीमान होईल अशी आशा करण्यास जागा आहे. राज्याचा दर्जा मिळण्यासाठी तेथील निवडणुकांचे निकाल महत्त्वाचे ठरणार असल्याने ही शक्यता निर्माण झाली आहे.