रशिया-युक्रेन युद्धात रशिया अण्वस्त्र हल्ला करणार, असे पुतीन म्हणाले होते. मात्र, आता त्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. याचा अर्थ अण्वस्त्रांचा धोका संपला का?
आजच्या घडीला पाकिस्तानात लष्कर ए झांगवी, पाकिस्तान तालिबान, अफगाण तालिबान आणि काही दहशतवादी संघटना पाकिस्तान सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. निर्वाचित सरकार पाडून बंदुकीच्या जोरावर पाकिस्तानच्या सैनिकांच्या मदतीने त्यांना देशावर राज्य करायचे आहे. ही अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागले तर पाकिस्तान हा जगासाठी धोकादायक देश ठरू शकतो.
पाकिस्तानातील अण्वस्त्रांच्या सुरक्षेवरून अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी चिंता व्यक्त केली होती. अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान हा जगासाठी सर्वात धोकादायक देश आहे, असे त्यांनी म्हटले होते. अर्थात, भारताने यापूर्वीच याबाबत इशारे दिले आहेत. बायडेन यांनी चिंता व्यक्त करताना त्यावर उपाय काय असेल, हे मात्र स्पष्ट केलेले नाही. अशा चिंतेतून कोणतेच परिणाम हाती पडणार नाहीत. वास्तविक हे वक्तव्य अमेरिकेच्या कुटनीतीचा एक भाग असू शकतो. कारण पाकिस्तानला एफ16 लढाऊ विमाने आणि त्याच्या देखभालीसाठी 45 कोटी डॉलरची आर्थिक मदत अमेरिकेनेच दिली आहे. 2018 नंतरची ही सर्वात मोठी मदत मानली जाते. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र पाकिस्तानची मदत थांबविली होती. पाकिस्तान अमेरिकेच्या दहशतवादविरोधी लढाईत कोणतेच सहकार्य करत नसल्याने पाहून ट्रम्प यांनी मदतीवर बंदी घातली होती. वास्तविक बायडेन यांनी पाकिस्तानला मदत करून भारताच्या दृष्टिकोनातून एकप्रकारे आगीत तेल ओतण्याचे काम केले.
लॉस एंजल्स येथील डेमोक्रॅटिक पार्टीच्या खासदारांसमोर बोलताना बायडेन यांनी अमेरिकेच्या आतंरराष्ट्रीय धोरणासमोरच्या प्रमुख आव्हांनाचा ऊहापोह करताना पाकिस्तानाबाबतचे मत मांडले. त्याचबरोबर रशिया आणि चीनचाही उल्लेख केला. ते म्हणाले, की जिनपिंग यांना काय हवे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. परंतु त्यांच्यासमवेत अनेक आंतरराष्ट्रीय अडचणी आहेत. पाकिस्तान हा सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे. त्यांच्याकडे अण्वस्त्रे असून त्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही हमी नाही. बायडेन यांनी चीनकडून व्यापाराच्या आघाडीवर अमेरिकेला मिळणारे आव्हान आणि युक्रेन-रशियाच्या संघर्षाचा जगावर झालेल्या परिणामाचा देखील मुद्दा मांडला. वास्तविक अलीकडेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली होती. आता मात्र त्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. तरी दुसरीकडे पाकिस्तानातील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडले तर मोठे संकट निर्माण होऊ शकते.
अण्वस्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तानकडे सध्याच्या काळात 140 ते 150 अण्वस्त्रे आहेत. अण्वस्त्र तयार करण्याचा हाच वेग राहिला तर 2025 पर्यंत त्याची संख्या वाढून ती 220 ते 250 पर्यंत पोचेल. याप्रमाणे पाकिस्तान हा जगातील पाचव्या क्रमांकाचा अण्वस्त्रधारी देश म्हणून नावारुपास येईल. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे माजी अधिकारी केव्हिन हलबर्ट यांनी देखील पाकिस्तान हा जगासाठी सर्वात धोकादायक देशापैकी एक असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानात तीन प्रकारच्या जोखमीत वाढ होत असल्याने त्या देशाचा चेहरा भयावह आणि भेसूर बनला आहे. वाढता दहशतवाद, ढासळणारी अर्थव्यवस्था आणि अण्वस्त्रांचा गरजेपेक्षा अधिक साठा. अशा प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना उत्तर कोरिया देखील करत आहे. दोन्ही देश भारत व अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देत आले आहेत.
पाकिस्तान हा जगासाठी धोकादायक देश असो किंवा नसो, भारतासाठी मात्र आहे. अनेक दशकांपासून भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे. याशिवाय काश्मीरमध्ये घुसखोरी करत काश्मीरमध्ये अशांतता निर्माण केली जाते. पण दहशतवाद्यांना भारताच्या सीमेलगत आश्रय देण्याचे पाकिस्तानचे डावपेच आता त्यांच्याच अंगलट येऊ लागले आहेत. दहशतवादी संघटनांत शिया विरुद्ध सुन्नी संघर्ष होत आहे. त्यामुळे पाकिस्तानात अंतर्गत कलह आणि अस्थैर्य वाढले आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात पाकिस्तानला दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू कराव्या लागल्या आहेत. तरीही पाकिस्तानचे सैन्य, गुप्तचर संस्था हे तालिबान, अल-कायदा, लष्कर-ए-तोय्यबा, जैश-ए-महंमद यासारख्या संघटनांना धोकादायक मानण्यास तयार नाहीत.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. या अणुबॉम्बमुळे वातावरण दूषित झाले आणि आजही त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो नागरिकांना आजाराने घेरले. बाधित भागात दिव्यांग मुले जन्माला आले. तत्कालीन काळात अण्वस्त्र निर्मिती ही प्रारंभिक स्थितीत होती. तेव्हापासून आजतागायत अण्वस्त्र निर्मितीत व्यापक प्रगती झाली आहे. त्यामुळे अशा अण्वस्त्रांचा वापर केल्यास त्याचे परिणाम हिरोशिमा-नागासाकीपेक्षा भयानक असतील. त्यामुळे जगात उपलब्ध असणारे अण्वस्त्रे हे पृथ्वीला एकदा नाही तर अनेकदा नष्ट करू शकतात. जपानवर अणुहल्ला झाल्याने अस्वस्थ झालेले अल्बर्ट आइनस्टाइन आणि ब्रिटिश विचारवंत बट्रेंड रसेल यांनी एक संयुक्तपणे निवेदन जारी करत अण्वस्त्रांचा वापर हा विनाशाकडे नेणारा असल्याचे म्हटले होते. त्यात म्हटले, की तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा निश्चितच वापर केला जाईल. यामुळे संपूर्ण मनुष्यजात संकटात पडेल अणि मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. चौथे महायुद्ध मात्र काठी आणि दगडाने लढले जाईल. अण्वस्त्रामुळे होणारी मनुष्यहानी पाहता संपूर्ण अण्वस्त्रे नष्ट करायला हवीत.
भविष्यात देशादेशांमधील संघर्षाने जागतिक रूप धारण केले तर अण्वस्त्रे हल्ले सुरू होतील आणि त्यावेळच्या स्थितीची कल्पना आपण करू शकणार नाही. अण्वस्त्रांचे भयावह परिणाम पाहता माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संयुक्त राष्ट्रात अण्वस्त्रे समूळ नष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, अण्वस्त्रसज्ज देशांनी या आवाहनाकडे लक्ष दिले नाही. आता तर अण्वस्त्रसज्ज देशांनी युद्धासाठी अण्वस्त्रांचा वापर नाही, असा खोटा करार करत युरेनियमचा उघड बाजार सुरू केला आहे. अणुऊर्जा आणि आरोग्य सेवेच्याआड अनेक देश अण्वस्त्रसज्ज झाले आहेत. शस्त्रास्त्रांचा साठा हळूहळू वाढवत आहेत. तूर्त जगात नऊ अण्वस्त्रसज्ज देश आहेत.
अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया. यात अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि ब्रिटनकडे अण्वस्त्रांचा मोठा साठा आहे. अर्थात हे पाचही देश अण्वस्त्रप्रसार बंदी करारात सामील आहेत. या करारामागचा उद्देश अण्वस्त्रे आणि अण्वस्त्रे निर्मिती यावर निर्बंध घालणे. अर्थात, पाचही देश हा उद्देश गाठू शकलेले नाहीत. त्यामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याची टांगती तलवार कायम राहणार, असे दिसते.