राष्ट्रीय स्तरावर एक मोठा पक्ष बनण्याची आणि मोठा नेता म्हणून पुढे येण्याची अरविंद केजरीवालांची सुप्त इच्छा आता लपून राहिलेली नाही.
देशातील राजकीय पक्ष सध्या “इलेक्शन मोड’मध्ये आलेले दिसताहेत. मग ते विधानसभा निवडणुका असोत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका असोत; या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त कसे मागे खेचता येईल यासाठी राजकीय पक्षांमध्ये जबरदस्त मंथन सुरू आहे. एकीकडे स्वतःचा पक्षविस्तार कसा होईल याची रणनीती ठरवतानाच भाजपेतर पक्षांची मोट बांधून एकत्र लढाई लढण्याचेही डावपेच आखले जात आहेत. भाजपविरोधी पक्षांमध्ये एकीकडे कॉंग्रेस, दुसरीकडे तृणमूल, राष्ट्रवादी, सपा, डावे पक्ष आदींचा गट आणि तिसरीकडे आम आदमी पक्ष असे तीन प्रमुख कोन दिसताहेत.
केजरीवाल हे प्रशानातून शासनात म्हणजेच राजकारणात आले असले तरी राजकारणात भल्या भल्या मुरब्बी धुरिणांना त्यांनी धोबीपछाड दिली आहे. 2014 मध्ये मोदींचा चौखूर उधळलेला अश्वमेध दिल्लीत केजरीवालांपुढे टिकू शकला नाही. पंजाबमध्ये कॉंग्रेसच्या सरकारला मागे सारून सत्ता काबीज करण्यात “आप’ला यश आले. त्यामुळे केजरीवालांची विधाने, त्यांच्या भूमिका दुर्लक्षिता येणार नाही. विशेषतः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेकडे पाहायला हवे. धार्मिकबाबतीत संवेदनशील असणाऱ्या गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांचे सॉफ्ट हिंदुत्व “आप’ला मोठा फायदा मिळवून देऊ शकते, असे मानले जात आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठ्या बहुमताने सरकार स्थापन केल्यानंतर आणि गोवा विधानसभा निवडणुका लढवल्यानंतर केजरीवालांचे पुढचे लक्ष्य काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. अपेक्षेनुसार त्यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होमग्राउंड असणाऱ्या गुजरातची निवड केली आहे.
आम आदमी पक्षाची स्थापना ही प्रादेक्षिक पक्ष म्हणून झालेली नाही. हा पक्ष नेहमीच राष्ट्रीय स्तरावर राजकारण करताना दिसतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही “आप’ने सर्वाधिक जागा लढविल्या होत्या, हे अनेकांना ठाऊक नसेल. अरविंद केजरीवाल सुरुवातीपासूनच आपली भूमिका देशव्यापी दृष्टिकोनातून मांडताना दिसतात. त्यांच्या पत्रकार परिषदा लक्षपूर्वक ऐकल्या तर असे दिसून येईल की, दिल्लीसंदर्भात घेतला गेलेला एखादा निर्णयसुद्धा ते माध्यमांद्वारे पूर्ण देशाला सांगतात. अलीकडेच केजरीवाल यांनी हरियाणामध्ये भारताला पहिल्या क्रमांकाचा देश बनवण्यासाठी संकल्प रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीतील त्यांचे भाषण त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर करीत होते.
याच रणनीतीचा एक भाग म्हणून केजरीवालांनी दबक्या पावलांनी उजवे वळण घेतल्याचे दिसत आहे. आपण हिंदूविरोधी नाही हे दर्शवण्यासाठी त्यांनी नोटांवरील प्रतिमांचा मुद्दा पुढे आणत राष्ट्रीय पातळीवरील चर्चेला खाद्य दिले आहे. त्यांच्या रणनीतीचा लोलक उजवीकडे सरकल्याची अन्यही काही उदाहरणे आहेत. केजरीवाल सध्या दिल्लीत मोफत तीर्थ योजना चालवत आहेत. ते
स्वतःला हनुमानभक्त मानतात आणि विशिष्ट वेळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसासुद्धा म्हणतात. दिल्लीत शाहीन बागमध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनाकडे केजरीवाल यांनी दुर्लक्ष केले होते, हे विसरता येणार नाही. अलीकडील काळात “आप’ने मुस्लिमांशी निगडित मुद्द्यांना बाजूला सारले आहे. बिलकीस बानो प्रकरणात ज्याप्रकारे गुजरातमध्ये मनीष सिसोदिया यांनी हात झटकले त्यावरून याची स्पष्ट प्रचिती येते. हिंदुत्ववादी व्होटबॅंकेला दुखावणाऱ्या कोणत्याही प्रकरणात केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला गुंतायचे नाहीये. सध्याच्या भारतीय राजकारणात कोणताही पक्ष हिंदुत्वाशी अनुकूल भूमिका घेत असेल तर त्या पक्षावर भाजपाची बी टीम असल्याचा शिक्का मारला जातो. खरेतर याचा सर्व फायदा भाजपालाच मिळतो. कारण यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्याची काळजी करणारा खंदा पक्ष म्हणून आपोआपच भाजपाकडे पाहिले जाते. वास्तविक पाहता, देशातील बहुसंख्य समाजाची बाजू घेतल्यामुळे तुम्ही अल्पसंख्याकांच्या विरोधात जात नाही, ही बाब भाजप विरोधी पक्षांनी समजून घ्यायला हवी.
अरविंद केजरीवाल भाजपाच्या अनेक मुद्द्यांना कडवा विरोध करताना दिसतात, मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतात. पंतप्रधान मोदी यांनी “मोफत रेवडी’चा मुद्दा मांडला तेव्हा केजरीवालांनी आक्रमक प्रतिवाद केला; पण कलम 370 आणि राम मंदिर यासारख्या संवेदनशील विषयांबाबत भाजपाने घेतलेल्या निर्णयांचे केजरीवालांनी स्वागत केले.
आजघडीला राज्यसभेत आम आदमी पक्षाचे 10 खासदार आहेत. निवडणूक आयोगाचे नियम पाहिले तर आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. सध्या दोन राज्यांत “आप’चे स्पष्ट बहुमताचे सरकार आहेत आणि गोव्यात या पक्षाला 6 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. गुजरात विधानसभा निवडणुका यावेळी “आप’ला राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी शेवटचा दरवाजा असणार आहे. जर आप गुजरातमध्येसुद्धा भरघोस मते मिळवण्यात यशस्वी झाला आणि काही जागांवर या पक्षाला विजय मिळाला तर तो राष्ट्रीय पक्षांच्या पंक्तीत जाऊन बसेल.
सुरुवातीपासूनच आम आदमी पक्ष इतर कोणत्याही प्रादेक्षिक पक्षांपेक्षा वेगळा आहे. आप कोणत्याही जातीधर्माचे राजकारण करीत नाही, भाषेचे राजकारण करीत नाही, प्रादेक्षिक अस्मितेचे राजकारण करीत नाही. “आप’च्या केद्रस्थानी देशातील गरीब, कष्टकरी, शोषित वर्ग आणि मध्यमवर्ग आहे. याच वर्गाच्या अवतीभोवती केजरीवाल यांचे राजकारण फिरताना दिसते. किंबहुना, या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून त्यांना दिलासा देणाऱ्या योजना आखून त्याची प्रभावी अमलबजावणी केल्यामुळे “आप’चा देशभरात गाजावाजा झाला. मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, मोफत वीज यासारख्या लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या योजनांच्या माध्यमातून “आप’ने देशातील सर्व राज्यांतील सामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पण भारतीय राजकारणात केवळ आर्थिक मुद्दे प्रभावी ठरत नाहीत.
धार्मिकतेचा मुद्दा या ना त्या माध्यमातून निवडणुकीतील मतदानावर हावी होत असतो, हे इथल्या लोकशाहीचे कटू वास्तव आहे. एव्हाना सत्तेच्या राजकारणात मुरलेल्या केजरीवालांनी ते अचूकपणाने ओळखले आहे. मजल-दरमजल करत “आप’ची वाटचाल अशीच सुरू राहिल्यास देशातील प्रस्थापित, जुन्या राजकीय पक्षांपुढे केजरीवाल हे नवे आव्हान म्हणून उभे राहू शकतात.