भक्तिमार्ग हा भारतीय अध्यात्मशास्त्राने सांगितलेला सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे. आपल्या उपास्य देवतेची उपासना करण्याचे अनेक मार्ग हे भक्तिमार्ग म्हणूनच ओळखले जातात. नऊ विविध मार्गांनी भक्ती केली जाऊ शकते म्हणून हे नवविधा भक्तिमार्ग म्हणून स्वीकारले आहेत. कुठल्याही मार्गाने केलेली भक्ती सात्विक असावी, हे मात्र निश्चित.
भक्तीत सात्विकता आणणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे. त्यामुळे क्रोध नियंत्रित होऊन तामसीवृत्ती कमी होते व सात्विकता वाढीस लागते हे मुख्य सूत्र आहे. आहारातही सात्विकता आल्यास विचारात आणि कृतीत सात्विकता येते म्हणून सात्विक आहार साधकाने घ्यावा असा आग्रह धरला जातो तो यासाठीच. नामस्मरण हा भक्तीचा सहजसोपा मार्ग आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे-
हरी मुखे म्हणा हरिमुखें म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।।
नामस्मरणावर श्रद्धा ठेवूनच, हिरण्यकश्यपूने अनेक मार्गांनी केलेला छळ सहन करून परमभक्त म्हणून ओळखला जाणारा भक्त प्रल्हाद शेवटपर्यंत सात्विक राहिला. कारण नारायणाचा नामउच्चार त्याच्या मनावर बिंबलेला होता. म्हणून माऊलींच्या प्रमाणानुसार-
सत्वरी उच्चार प्रल्हादी बिंबला।
उद्धवा लाभलं कृष्ण दाता।।
अहंकाराचे विष मनातून काढणे हिरण्यकश्यपूला शक्य न झाल्याने त्याचा नाश झाला. तीच अवस्था रावणाचीही व दुर्योधनाचीही झाली. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये हा बोध प्रत्यक्षात उतरवणे व सात्विकतेने भक्ती मार्ग आक्रमित करणे यासाठी नित्य उपासना मार्गाचे न चुकता आचरण करावे. उपासनेत सातत्य असावे यासाठी दृढता असावी लागते. म्हणून असे म्हटले आहे की,
उपासनेला दृढ चालवावे।
भूदेव संतांशी सदा नमावे।।
माऊली हरिपाठात सांगतात त्याप्रमाणे-
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ।
लक्ष्मी वल्लभ तयाजवळी ।।
देवतेपेक्षा त्या देवतेचे नाम श्रेष्ठ अशीच मूळ संकल्पना नामस्मरणाच्या मागे आहे. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांनी रामनामाचा मार्ग भक्तिमार्ग म्हणून उपासकांना सांगितला. प्रपंचात राहूनही सात्विक भक्ती मार्गाने भक्ती करता येते. यासाठी श्री महाराजांनी रामनामाची उपासना साधकांना सांगितली. या सर्वांचा उद्देश मानवी जीवनाचे सर्वार्थाने कल्याण साधणे हाच आहे.