-अरुण गोखले
अधिकमासात केलेली दीपपूजा आणि दीपदान हे माणसाच्या सर्व पातकांचा नाश करते. त्यास सुख, शांती, संपत्ती आणि उत्तम आरोग्याचा लाभ होतो. ही दीपपूजा आणि दीपदान कसे आणि कोणास करावे ह्या संदर्भात या माहात्म्यात जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे-
दीपपूजेची जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी. त्यावर चौरंग वा पाट मांडावा. त्या भोवती रांगोळी काढावी. चौरंग अथवा पाटावर एक वस्त्र अंथरून त्यावर यथाशक्ती गव्हाची किंवा तांदळाची एक छोटी रास करावी. त्यावर एक कलश तयार करून ठेवावा. कलशावर ताम्हन ठेवावे.त्यात आपण जो दीप पूजन करून दान देणार आहोत तो ठेवावा. शक्यतो हा दिवा तांबे, चांदी यांचा असावा. त्यात तुपाची वात लावावी. या दीपाचे विधीवत पूजन करावे. दीपपूजा आणि दानाचा संकल्प करावा.
केलेल्या संकल्पाप्रमाणे असा दीप प्रज्वलित करून त्याची मनोभावे पूजा करावी. त्या दीपास आपल्या जीवनातील दु:ख, दारिद्य्र, नैराश्य ह्यांचा अंध:कार दूर करण्याची व भगवान श्री पुरूषोत्तमाची कृपा लाभावी अशी प्रार्थना करावी. संकल्पित तीन, सात, अकरा, पंधरा दिवस वा संपूर्ण अधिकमासभर या दीपाचे नित्य पूजन करावे. त्यानंतर हा दीप भगवान नारायण स्वरूप याचकास दान द्यावा किंवा जर उचित याचक मिळाला नाही, तर हा दिवा मंदिरात दान करावा.
या दीपदाना सोबतच काही लोक याचकास तेहतीस अनरसे, बत्तासे, खारका, बदाम, सुपाऱ्या यांचेही दान करतात. अशा दीपपूजनाने भगवान श्री कृष्ण हे त्या उपासकावर प्रसन्न होऊन त्यास इच्छित फल देतात.
अधिकमासातील दीपपूजन आणि दीपदानाने उद्धार झालेल्या सुशर्मा नावाच्या एका ब्राह्मणाची कथा या माहात्म्यात सांगितली आहे. याच कथेत असाही भाग आलेला आहे की त्या सुशर्माचे ते व्रत चालू असताना शेवटच्या दिवशी तो पहाटे स्नानास गेला. इकडे घरातील दिव्यातले तेल संपत आले. तेव्हा त्या दिव्यातली वात पळवायची म्हणून एक उंदीर तिथे आला.
उंदराची खुडबुड ऐकून कोपऱ्यात झोपलेले मांजर जागे झाले. मांजराने शिकार करण्याच्या हेतूने उंदरावर झेप घेतली. उंदीर पळाला. पण त्या धक्क्याने विझत आलेली वात परत प्रज्वलित झाली. त्या छोट्या पुण्याईच्या बळावर सुशर्मा बरोबरच त्या मांजराचाही उद्धार झाला.