कित्येक चौरस मैलाचा टापू उद्ध्वस्त करणारा ऍटम बॉंब आणि ऍटम बॉंबच्या दोन हजार पटीने भयंकर व संहारक असलेला हायड्रोजन बॉंब यायोगे, कम्युनिस्ट व कम्युनिस्ट विरोधक- दोन्ही गटातील लोक भयभीत झाले आहेत. त्यातल्यात्यात कम्युनिस्ट विरोधकाचे विचार प्रगट होत असल्याने त्यांच्या गर्भगळित मनःस्थितीवर अधिक प्रकाश पडतो.
एका हायड्रोजन बॉंबने संपूर्ण लंडन शहर भस्मसात होऊ शकेल एवढे अफाट सामर्थ्य या अस्रात साठवलेले आहे. अमेरिका व ब्रिटन ही जी कम्युनिस्टविरोधी गोटातील दोन प्रमुख राष्ट्रे त्यापैकी ब्रिटिश राष्ट्र अधिक चिंताक्रांत बनले आहे. कारण ब्रिटनची अवस्था जास्त संकटग्रस्त आहे. अमेरिकेच्या ऍटमबॉंबफेकी विमानदलाचे तळ ब्रिटनमध्ये आहेत. अर्थात महायुद्ध जर पेटले तर रशियाचा पहिला तडाखा ब्रिटनला बसेल.
अमेरिका दूर असल्यामुळे व अमेरिकेचा प्रदेशही विस्तीर्ण असल्यामुळे अमेरिकन मुसद्यांना ताठरपणा परवडतो. पण ब्रिटनचे तसे नाही. ब्रिटिश मुत्सदी हे जाणून आहेत की, दोन किंवा तीन हायड्रोजन बॉंब ब्रिटनच्या सर्वनाशास बस्स होतील. त्यामुळे सर विन्स्टन चर्चिल सुद्धा नरमले आहेत व त्यांनी आपला कम्युनिझम द्वेष आवरता घेतला आहे.
ते म्हणतात, “”कम्युनिस्ट राष्ट्रांच्या शेजारी राहण्यात ज्या अडचणी व संकटे आहेत त्यामानाने युद्धाचे सध्याचे स्वरूप इतके भीषण आहे की, कम्युनिस्टांचा शेजार परवडला असे वाटू लागले आहे.” तर कित्येक लोक असा प्रश्न उघड उघड विचारू लागले आहेत की, सर्वस्वी नष्ट होण्यापेक्षा कम्युनिस्ट म्हणून जगणे काय वाईट?
ते म्हणाले, “”मधूनमधून असा विचार डोक्यात येतो की, लढाऊ अस्रांना हे जे सर्वसंहारक रूप प्राप्त झाले आहे त्यामुळेच मानव समाजाला अनपेक्षित सुरक्षितपणा लाभेल. सर्वांचाच नष्टांश करण्याचे सामर्थ्य सर्वांना लाभल्यामुळे कोणालाच मारू नये असे प्रत्येकाला वाटू लागेल.” कोणतीही गोष्ट “अति’ झाली म्हणजे उलट प्रतिक्रिया होते असे म्हणतात.
तसेच या संहारक अस्रांच्या बाबतीत झाले आहे. त्यांचा संहारकपणा इतक्या पराकोटीस पोचला आहे की, त्यामुळे महायुद्धाची शक्यताच निकालात निघू पाहत आहे. या विचाराचा पगडा बसल्यामुळेच की काय, रशियाच्या मुत्सद्यांनी, सर्व प्रमुख राष्ट्रांच्या शस्त्रास्त्रांत पन्नास टक्के कपात करण्यात यावी अशी सूचना पुढे मांडली आहे. हाच विचार अधिक प्रभावी व सर्वव्यापी बनला तर दोन्ही गटांमध्ये दिलजमाई होणे कठिण नाही.