19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला आणि भारतात साम्राज्यशाहीच्या ज्या उरल्यासुरल्या खुणा होत्या, त्या पुसल्या गेल्या. 1928 साली मुंबईत गोवा कॉंग्रेस समितीची स्थापना झाली. त्यानंतर पुढे गोवा मुक्ती लढ्याचे शिल्पकार ठरलेल्या डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भूमिगत कार्य सुरू झाले. 1929 साली इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात गोवा कॉंग्रेसला भारतीय कॉंग्रेसची एक शाखा म्हणून मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र आणि गोमंतक यांना जोडणारा सांस्कृतिक धागा घट्ट असल्याने, गोवा मुक्ती चळवळीचे कार्य प्रामुख्याने महाराष्ट्रात सुरू झाले. पुढे 1967 मध्ये गोवेकरांना महाराष्ट्रात सहभागी व्हायचे आहे की, स्वतंत्र घटकराज्य म्हणून दर्जा हवा, हा निर्णय घेण्यासाठी गोव्यात सार्वमत घेण्याची मुभा देण्यात आली. गोव्याच्या जनतेने दुसरा पर्याय निवडला. या पर्यायाच्या कार्यवाहीस विलंब झाला, तरी पुढे 1987 मध्ये गोवा हे घटकराज्य म्हणून अस्तित्वात आले. मात्र, गोव्याच्या जनतेशी कॉंग्रेसचे जुळलेले नाते खूप पूर्वीपासूनचे आहे. आज देशभर कॉंग्रेसची दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीत मतांची झालेली फाटाफूट आणि विश्वासदर्शक ठरावावेळी 11 आमदारांची अनुपस्थिती याबद्दलची गंभीर दखल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतली आहे. कॉंग्रेस आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसचे संपर्क होऊ शकत नसलेले आणि अज्ञातस्थळी असलेले पाच आमदार गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात सहभागी झाले.
आपल्याकडून काहीही चुकीचे घडलेले नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु गोवा कॉंग्रेसमध्ये अजिबात आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 11 कॉंग्रेस आमदारांपैकी मायकेल लोबो, दिगंबर कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डिलायला लोबो यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यानंतर कॉंग्रेसने मायकेल लोबो यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरून हटवले होते. लोबो आणि कामत हे कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करून कट करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला. गुंडू राव यांच्यासारखा जबाबदार नेता पुरेसा पुरावा नसताना जाहीरपणे या प्रकारचा आरोप करणार नाही. मायकेल लोबो यांनी सांगितले की, आम्ही गेल्या रविवारी एका बैठकीसाठी गेलो होतो. वास्तविक बैठकीसाठी गेले होते, तरीही गुंडू राव प्रभृतींशी संपर्क ठेवायला हरकत नव्हती. कॉंग्रेसने गेल्या सोमवारी गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांच्याकडे मायकेल लोबो आणि दिगंबर कामत यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली. दोन्ही आमदारांनी विरोधी पक्षांत फूट पडण्यासाठी सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर गोव्यातील कॉंग्रेस पक्ष बंडखोरी रोखण्यासाठी सजग झाला. बरोबर तीन वर्षांपूर्वी कॉंग्रेसच्या दोनतृतीयांश आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गोवा कॉंग्रेसध्ये पुन्हा अशा प्रकारची बंडाळी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे गुंडू राव तातडीने पणजीत आले आणि त्यांनी कॉंग्रेस आमदारांबरोबर बैठक घेतली. गेल्या रविवारी बैठक सुरू होण्याआधी कॉंग्रेस नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुपारपर्यंत राव यांच्या भेटीसाठी अकरापैकी तीनच आमदार उपस्थित होते. आठ आमदार आले नसल्यामुळे कॉंग्रेसची चिंता वाढत होती. परंतु संध्याकाळपर्यंत उपस्थित आमदारांची संख्या सात झाली. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचीसुद्धा कॉंग्रेस नेत्यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कदाचित पुरेशा संख्येत, म्हणजेच दोनतृतीयांश इतक्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकत नसल्यामुळे हा प्रयत्न सोडून देण्यात आला असावा. पक्षाच्या आमदारांना भाजपात येण्यासाठी 40 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप गोवा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. कॉंग्रेसच्या आमदारांना उद्योगपती आणि कोळसा माफियांकडून फोन केले जात आहेत. ज्या आमदारांशी संपर्क साधण्यात आला, त्यांनीच ही माहिती गुंडू राव यांना दिली, असा दावा चोडणकर यांनी केला.
महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले, त्या प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देण्यात आले, असा आरोप झाला. या संदर्भातील कबुली देणारा एका आमदाराचा ऑडिओ व्हायरल झाला होता. महाराष्ट्रात एकूण तीन हजार कोटी रुपयांचे डील झाले, असेही सांगण्यात येत होते. अर्थात, अशा गोष्टींचे पुरावे कधीच मिळत नसतात; परंतु तर्काने आपण काही गोष्टींचा विचार करू शकतो. कॉंग्रेस आमदारांशी संपर्क साधून, त्यांना आम्ही पैसे देऊ केले, हे आरोप बिनबुडाचे असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हटले आहे. मात्र, कोणीही कितीही पैसे देऊ केले, तरी कॉंग्रेसवाले सहजपणे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हा खरा प्रश्न आहे. कॉंग्रेस विचाराचा माणूस तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वायएसआर कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता पार्टी अथवा बिजू जनता दलात गेला, तर समजू शकते; परंतु कॉंग्रेसचा माणूस आजकाल भाजपमध्ये सर्रासपणे जातो आहे, हे आश्चर्यकारक आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी, कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही आणि पक्षाशी एकनिष्ठ राहू, अशी शपथ गोव्यातील कॉंग्रेस आमदारांनी व नेत्यांनी घेतली होती. गोव्यातील कॉंग्रेसचे प्रमुख नेते दिगंबर कामत यांच्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर या पक्षाचे काही खरे नाही. इतके दिवस पक्षाने तुम्हाला भरपूर दिले. आता पक्षासाठी तुम्ही काहीतरी करा, असे कळकळीचे आवाहन सोनियाजींनी कॉंग्रेसमधील सर्वच नेत्यांना उद्देशून अलीकडेच केले होते. स्वार्थी कॉंग्रेस नेत्यांना पक्षनिष्ठेशी आणि एकूणच पक्षाशी काहीही देणेघेणे उरलेले नाही, हीच कॉंग्रेसची खरी शोकांतिका आहे. दुसरीकडे, भाजप मात्र राज्याराज्यात विरोधकांचे शिरकाण करण्यास उत्सुक बनला आहे. लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने विरोधी पक्षच जवळपास अंतर्धान पावणे, हे अत्यंत गंभीर व धोकादायक आहे.