हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, आता गुजरातेतही 1 आणि 5 डिसेंबर रोजी अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी केली आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांच्याही मातृराज्यात भाजपची ताकद किती आहे, हे या निमित्ताने दिसून येणार आहे.
वास्तविक हिमाचल प्रदेशच्या वेळीच गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा का केली गेली नाही, असा प्रश्न पत्रकारांनी निवडणूक आयुक्तांना विचारला होता. त्याला उत्तर देताना, राज्याराज्यांतील हवामान आणि इतर विविध मुद्द्यांचा विचार करून निवडणूक तारखांची घोषणा केली जाते, असे उत्तर राजीवकुमार यांनी दिले होते. गुजरात विधानसभेची मुदत संपण्यासाठी अजूनही बराच अवधी असल्याचे आणि हिमाचलमधील वाढत्या थंडीचे कारण यापूर्वीच त्यांनी दिले होते. परंतु 2012 साली हिमाचल आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा एकाचवेळी करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात, म्हणजे मोदी पर्वात मात्र 2017 व 2022 अशा दोन्ही वेळी विधानसभेच्या निवडणुकींची घोषणा वेगवेगळ्या वेळी करण्यात आली. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला यशाची खात्री वाटत असून, गुजरातबाबत मात्र त्यांचा आत्मविश्वास थोडा कमी आहे. त्यामुळे हिमाचलच्या निवडणुकांची घोषणा झाल्याबरोबर, मोदी गुजरातमध्ये गेले आणि तेथे त्यांनी नेहमीप्रमाणे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा करून टाकली. गोरगरिबांसाठी घरे, कुठे विमानतळ तर कुठे रस्त्यांची घोषणा करण्यात आली. परंतु मोरबी पूल दुर्घटनेमुळे या सगळ्यावर पाणी पडले. गुजरातचे सरकार आणि या पुलाचा ठेकेदार यांच्यात संगनमत असून, या दुर्घटनेमधील खऱ्या पापींना संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी असाच एक पूल पडला होता, तेव्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार जाण्याचेच हे चिन्ह आहे, असे उद्गार मोदी यांनी काढले होते. मोरबी पूल पडल्यानंतर, आता गुजरातमध्येही सत्ताबदल होणार का, असा प्रश्न विरोधक विचारू लागले आहेत. परंतु गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये सत्ताबदल झालाच नाही आणि यावेळी गुजरातेतही सत्तांतर होईलच, याची खात्री नाही. 2017च्या विधानसभा निवडणुकीत 182 पैकी भाजपला 99, तर कॉंग्रेसला 77 जागा जिंकता आल्या. भाजपला 49 टक्के, तर कॉंग्रेसला 42 टक्के मते मिळाली. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपचे संख्याबळ 111 वर पोहोचले असून, कॉंग्रेसची सदस्यसंख्या 62 पर्यंत घसरली आहे. गुजरातमध्ये 1995 पासून सत्तेवर असलेल्या भाजपचे सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. मोदींच्या यशस्वी कारकिर्दीनंतर, गुजरातेत आलेल्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी चमकदार राहिलेली नाही. आनंदीबेन पटेल, विजय रूपानी आणि सध्या भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री आहेत. अर्थातच अँटिइनकम्बन्सीची लाट असली, तरी समोर ठोस पर्याय नसल्याचा फायदा भाजपला होत आहे. 2017 मध्ये कॉंग्रेसने भाजपच्या नाकात दम आणला होता. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अप्रत्यक्षपणे भाजपला मदतच केली होती. गेल्या पाच वर्षांत मात्र कॉंग्रेसने गुजरातमध्ये तेवढे लक्ष घातले नाही आणि पाटीदार आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेले हार्दिक पटेलही कॉंग्रेस सोडून भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत.
सोनिया गांधी वा राहुल गांधी यांनी, गुजरातचे सातत्याने दौरे करणे आवश्यक होते, तेही घडले नाही. राज्यात कॉंग्रेसकडे मोठा नेताही नाही. तो तसा तयार करण्याकडे कॉंग्रेसने लक्षही दिले नाही. या उलट, दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता मिळवल्याने तेजीत असलेल्या “आप’नेही गुजरातमध्ये भाजपसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. 2002 साली गुजरातमध्ये दंगली झाल्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. तेव्हा धार्मिक ध्रुवीकरण झाल्यामुळे, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने 127 जागा मिळवल्या. भाजपची ही सर्वोत्तम कामगिरी होती. त्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला 2007 साली 117 जागा मिळाल्या, तर 2012 मध्ये मोदी यांनी स्वतःला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नियोजित केल्यानंतरही 115 जागाच मिळाल्या होत्या. हा आकडा 2017 मध्ये आणखी खाली आला.
याचा अर्थ, गुजरातमधील भाजपच्या घसरगुंडीचा आलेख सुरू आहे. मात्र आपमुळे कॉंग्रेसला मिळणाऱ्या मतांपैकी 75 टक्के मते यावेळी आपच्या पारड्यात जातील, तर भाजपला आपमुळे फारसा फटका बसणार नाही, अशी शक्यता जनमत चाचणी अहवालातून अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या गुजरातमध्ये भाजप विरुद्ध आप, अशी लढाई रंगवण्याचा प्रयत्न तेथील सत्ताधारी पक्षातर्फे सुरू आहे. आपला जेवढी अधिक मते मिळतील, तेवढे कॉंग्रेसचे अधिक नुकसान होईल आणि दोघांच्या भांडणात आपल्याला फायदा होईल, असे भाजपचे गणित आहे. परंतु आपची ताकद फक्त मुख्यत्वे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र विभागातील शहरी भागात आहे. भाजप गुजरातमधील शहरांत लोकप्रिय आहे. त्यामुळे खरे तर आपचा त्रास भाजपलाही होऊ शकतो.
पूल कोसळल्यामुळे मोदींच्या गुजरात मॉडेलवर सवाल उपस्थित केले जात आहेत. कॉंग्रेसची ताकद ग्रामीण भागात अधिक असून, हा पक्ष तेथे कसा प्रचार करतो, यावरच त्याचे यश अवलंबून आहे. आगामी विधानसभा निवडणूक गुजरातच्या मुद्द्यावर लढवण्यापेक्षा, राष्ट्रवाद, देशाची विदेशातील उंचावलेली पत आणि नवनवीन विकासयोजना या मुद्द्यांभोवती खेळण्याची चाल भाजपने आखली आहे. मोदींच्या करिश्म्याचाच पुन्हा एकदा लाभ उठवणे, हा त्यामागील हेतू आहे. गुजरातमधील भाजपचे नेतृत्व दुबळे असून, अजूनही मोदींच्याच जीवावर भाजपला निवडणुका लढवाव्या लागत आहेत. एकेकाळी नेहरू-गांधी घराण्याच्या करिष्म्यावर कॉंग्रेस मते मिळवत होती. आता भाजप या बाबतीत कॉंग्रेसचाच पॅटर्न राबवत आहे.