अहमदाबाद – गुजरातमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय झाला तसाच कॉंग्रेसचाही अभूतपूर्व पराभव झाला. मात्र आजच्या विधानसभा निकालानंतर सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे की यावेळी कॉंग्रेस लढतीत असल्यासारखे वाटलेच नाही. त्या पक्षाने संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरातच्या निवडणुकीबाबत इतका अनुत्साह का दाखवला आणि त्यामागचे गूढ आहे तरी काय?
निवडणुकीचा बिगूल वाजण्याच्या अगोदरपासूनच भारतीय जनता पार्टी तयारीला लागली होती. दिल्लीतील आम आदमी पक्षही जोरात तयारीला लागला आणि त्या पक्षाने प्रचारात आघाडीही घेतली. मात्र भाजपला सगळ्यांत जास्त धोका ज्या पक्षाकडून होता त्या कॉंग्रेसमध्ये असलेला सूस्तपणा चक्रावणारा होता. संपूर्ण प्रचाराच्या काळात एक दिवसही असे वाटले नाही की कॉंग्रेस जोरात टक्कर देईल. उलट त्यांनी लढण्याच्या अगोदरच ही निवडणूक भाजपसाठी सोडून दिल्याचाच भास होत होता.
वास्तविक 2017 च्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखंड प्रचार केला होता. त्यांनी त्यावेळी युवा शिलेदारांना व पर्यायाने त्यांच्या समाजाला आपल्याकडे वळवले होते. या तरूण नेत्यांची चांगली मोट बांधली होती. हार्दिक पटेल यांच्यासारखा मोहरा कॉंग्रेसच्या हाती लागला होता. तर जिग्नेश मेवानीसारखा आणखी एक हिरा त्यांना गवसला होता.
हार्दिक पटेल यांना पाटीदार समाजाचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपची झोप उडाली होती. कॉंग्रेस येणारच असे दावे त्यावेळी छातीठोक करण्यात आले. तसे झालेही. कॉंग्रेस अगदी बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचली. मात्र बड्या नेत्यांच्या प्रचाराचा लाभ घेण्यासाठी खालपर्यंत यंत्रणा कामाला कशी लावायची याचा अनुभव कुठेतरी कमी पडला असावा आणि विजयाचा तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
एक ते चित्र होते तर एक आताचे. 2022 मध्ये कॉंग्रेस मैदानात दिसलीच नाही. लो प्रोफाइल प्रचार सुरू असल्याची वदंता होती. स्वत: मोदी यांनीही भाजप कार्यकर्त्यांना कॉंग्रेसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. मोदींनी आम आदमी पक्षाला खिजगणतीतही घेतले नाही.
पण कॉंग्रेस काय करत होती? पक्ष संघटना काय करत होती? गेल्या निवडणुकीत भाजपला जेरीस आणणाऱ्या या पक्षाकडे आमदारांची संख्या प्रचंड होती. अगदी शेवटच्या टप्प्यात काही जण भाजपच्या छावणीत दाखल झाले. मात्र पक्षात जी मरगळ आली ती गेलीच नाही. सरकारविरुद्धच्या तब्बल पावशतकाच्या नाराजीचा लाभ कॉंग्रेसला घेता आला नाही. गेल्या पाच वर्षांत ना हा पक्ष सरकारची कोंडी करू शकला ना आपल्या चांगल्या कामाची मांडणी करू शकला.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून गेलीच नाही. ज्या ज्या राज्यात यात्रा गेली तेथे यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला. मग गुजरातला वळसा घालण्याचे कारण काय होते? हे अगदी विलक्षण ठरले. राहुल त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून काही तासांसाठी गुजरातला आले. त्याची हवाही प्रदेश नेत्यांना आणि संघटनेला करता आली नाही.
संपूर्ण पक्षच निवडणुकीच्या पटलावरून गायब होता. गांधी घराणे काही काळ पक्षसंघटनेच्या राजकारणापासून दूर गेले म्हणून ही नाराजी होती का? सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी लक्षच दिले नाही म्हणून पक्षसंघटनेत शैथिल्य आले का? गुजरात आपल्या पक्षाच्या यादीत येतच नाही असा कॉंग्रेस नेत्यांचा समज झाला होता का? की त्यांनी गुजरात आता पूर्णपणे मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी सोडून दिले आहे व त्यांच्या विरोधात लढण्याची… किमान गुजरातमध्ये लढण्याची जिद्द सोडून दिली आहे का, असे बरेच प्रश्न आहेत.
आम्ही जनसंपर्कावर भर दिला, फार गाजावाजा केला नाही, धनशक्ती कमी पडली, आप आणि एमआयएमने मते खाल्ली ही काही उत्तरे पुढच्या काळात येतील. त्याकरताही अगोदर समिती स्थापन केली जाईल, मग ती समिती राज्याला भेट देईल आणि नंतर त्यांचे निष्कर्ष असणारा अहवाल सादर करेल व त्यानंतरच ही सगळी कारणे सांगितली जातील. मात्र हे करताना कॉंग्रेसला सोयीस्कर विसर असा पडतो की हिमाचलात त्यांचा प्रचार जिवंत वाटत होता आता त्याचा लाभ त्यांना झाला. गुजरातमध्ये हा जिवंतपणा कुठेच जाणवला नाही. त्याचे परिणाम समोर दिसत आहेत.