-स्वप्निल श्रोत्री
पाकिस्तान हे अपयशी ठरलेले राष्ट्र असून पाकिस्तान समोर भारत द्वेषाशिवाय कोणताही दृष्टिकोन नाही. ज्या दहशतवादाच्या बळावर पाकिस्तान आज भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, तोच दहशतवाद पाकिस्तानचा भविष्यात घात करणार हे निश्चित आहे.
कोणताही देश विकसित तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा त्याच्या आजूबाजूचे देश विकासाच्या वाटेवर असतील. जर शेजारील देशांत अशांतता, अनागोंदी आणि अस्थैर्य असेल तर साहजिकच त्याचे फटके आपल्या देशालाही बसणार आहेत. त्यामुळे जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू पाहणारी आणि विकसित होऊ इच्छिणारी राष्ट्रे आपल्या शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध ठेवतात. त्यांच्या समस्या ह्या आपल्या समस्या असे समजून त्या निवारणासाठी प्रयत्न करतात. परंतु, ह्याला अपवाद असणारी अनेक राष्ट्रे आज पृथ्वीतलावर असून त्यात पाकिस्तानचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले पाहिजे.
भारत, पाकिस्तानसह संपूर्ण जग आज करोना महामारी आणि आर्थिक संकटाशी झुंजत असतानाही पाकिस्तानने आपला मूळ स्वभाव काही सोडला नाही. मागील दहा-बारा दिवसांत पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबाराच्या इतक्या घटना घडल्या आहेत की, त्याची सरासरी गेल्या सहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त भरते. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी कराराच्या भंगामुळे दोन्हीकडील जवान, सामान्य नागरिक, पाळीव जनावरे आणि संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. परंतु, तरीही पाकिस्तानची खोड काही जात नाही. त्यामुळे पाकिस्तान सतत करत असलेल्या शस्त्रसंधी कराराच्या उल्लंघनामागे मूळ कारण काय आहे? हे समजणे आवश्यक आहे.
हिमालयातील भौगोलिक परिस्थिती
डिसेंबर महिना सुरू होत असून हिमालयात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होण्यास लवकर सुरुवात होईल. एकदा हिमालयासह काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरू झाली की, तेथील रस्ते, महामार्ग दळणवळणाचे साधने पुढील तीन ते साडेतीन महिन्यांसाठी ठप्प होतात. जनजीवन विस्कळीत होते. परिणामी काश्मीर खोऱ्यात बर्फ जमा होण्याच्या आगोदर भारतात दहशतवादी पाठविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो.
भारतासोबत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर (एलओसी) मोठ्या प्रमाणावर गोळीबार व उखळी तोफांचा मारा करायचा जेणेकरून भारतीय जवानांचे लक्ष विचलित होईल आणि दहशतवादी दुसऱ्या मार्गाने पाकिस्तानातून भारतात प्रवेश करतील, ही साधारण पाकिस्तानची योजना असते.
भारताला सतर्क राहणे गरजेचे
पाकिस्तान किंवा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा अभ्यास केला तर साधारणपणे हे हल्ले ऑक्टोबर-नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्च दरम्यान झालेले दिसतात. आधी सांगितल्याप्रमाणे हिमालय आणि काश्मीर खोऱ्यात बर्फ जमा होण्याच्या अगोदर पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येतात, परिस्थितीची माहिती घेऊन हल्ला करतात.
उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर… 1) श्रीनगर हल्ला – 13 मार्च 2013. 2) जम्मू हल्ला – 20 मार्च 2015. 3) पठाणकोट हल्ला – 2 फेब्रुवारी 2016. 4) उरी हल्ला – 18 सप्टेंबर 2016. 5) बारामुल्ला हल्ला – 3 ऑक्टोबर 2016. 6) हांडवारा हल्ला – 6 ऑक्टोबर 2016. 7) नागोर्टा हल्ला – 29 नोव्हेंबर 2016. 8) सुंजूवन हल्ला – 10 फेब्रुवारी 2018. 9) अवंतीपुरा हल्ला – 14 फेब्रुवारी 2019.
या शिवाय इतर अनेक हल्ले आहेतच. त्यामुळे ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून भारतीय सीमेवर उखळी तोफांचा मारा सुरू आहे, त्याचा जर विचार केला तर भारतावर पुढील काही दिवसांत मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारताचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न
येत्या वर्षापासून पुढील दोन वर्षांसाठी भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होत आहे. सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्याची भारताची फार जुनी इच्छा असून भारताच्या ह्या मागणीला जगातील अनेक राष्ट्रांचा विशिष्ट आफ्रिकेतील देशांचा वाढता पाठिंबा आहे. मागील वर्षी जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या सदस्यत्वाला जर्मनीचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. थोडक्यात, भारतीय उपखंडाचा नेता ते जागतिक नेता असा भारताचा प्रवास सुरू असून भारताने जागतिक राजकारणात निर्णायक भूमिका निभावू नये म्हणून पाकिस्तान शस्त्रसंधीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतो. शस्त्रसंधीचा भंग करून पाकिस्तान जागतिक समुदायाला असा संदेश देऊ इच्छितो की भारत हा आपल्या शेजारील राष्ट्रांशी असलेल्या समस्यांमध्येच गुंतला असून तो जागतिक राजकारणात भूमिका घेऊ शकत नाही. असो.
पाकिस्तानपेक्षा चीनची कोंडी करणे अधिक आवश्यक
पाकिस्तान समस्येवर गेल्या सत्तर वर्षांत भारताने हरतऱ्हेचे उपाय करून पाहिले. चार वेळा युद्ध केले, मैत्री प्रस्ताव करून पाहिले, बहिष्कार टाकला, आर्थिक कोंडी केली, आंतरराष्ट्रीय दबाव टाकून पाहिला. परंतु, आजही पाकची समस्या आहे तशीच आहे. पाकिस्तान हा पायापासून डोक्यापर्यंत कर्जात बुडालेला देश असून राजकीय अनागोंदी तेथे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे स्वतःच्या बळावर असले “उद्योग’ करणे पाकला शक्य नाही. परंतु, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे चीन भारताला नामोहरम करण्यासाठी पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करीत असतो. चीनची अर्थव्यवस्था मोठी आहे. शिवाय लष्करी ताकदही अफाट आहे. त्यामुळे पाकिस्तानसह चीनशी एकाचवेळी पंगा घेणे भारताला परवडण्यासारखे नाही. परंतु, भारतात होणाऱ्या दहशतवादी घटनांचा थेट संबंध चीनशी आहे, हे आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून देणे भारताला सहज शक्य आहे.
मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांकडून जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या वेळेस चीनवर मोठा आंतरराष्ट्रीय दबाव भारत आणि अमेरिकेकडून टाकण्यात आला होता आणि चीन त्या दबावासमोर झुकलासुद्धा होता. त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचा दबाव चीनवर टाकणे गरजेचे आहे.