भारतातील लोकशाही राजकारण हे नेहमीच रंजक घटना आणि घडामोडींनी परिपूर्ण असते. साहजिकच अधूनमधून या राजकारणाच्या व्यासपीठावर अनेक गौप्यस्फोट केले जात असतात. महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वीच्या त्या प्रसिद्ध अशा पहाटेच्या शपथविधीबाबत जी माहिती दिली आहे, त्याचे वर्णनही आता “गौप्यस्फोट’ या प्रकारेच करण्यात येत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा कोणाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसत नव्हती तेव्हा अचानक भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सर्व राजकारण्यांना धक्का दिला होता. जरी फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार फक्त 72 तास टिकले असले, तरी या शपथविधीची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना होती, अशा प्रकारचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरू झाली आहे. खरे तर गेल्या तीन ते साडेतीन वर्षांच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो त्यांनी नेहमीच या विषयावर बोलणे टाळलेले आहे.
अजित पवार यांनी तर नेहमीच या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. फडणवीस यांनी गेल्या काही कालावधीमध्ये याबाबत जरी सूचक विधाने केली असली, तरी त्यांनी आतापर्यंत कधीही शरद पवार यांचे नाव घेतले नव्हते. पण काही दिवसांपूर्वी 2021 सालची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या ऑफ द रेकॉर्ड मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी त्या पहाटेच्या शपथविधीबाबत विस्ताराने सर्व माहिती दिली आहे. विधानसभा निवडणूक जरी भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे लढवली असली तरी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास उद्धव ठाकरे उत्सुक नाहीत, असे दिसून आल्यानंतर भाजपने इतर पर्याय चाचपण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीने आम्हाला ऑफर दिल्यामुळे आम्ही हा पहाटेचा शपथविधी केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या या ऑफ द रेकॉर्ड मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असे अनेक गौप्यस्फोट केले आहेत जे आता बाहेर आणले जात आहेत. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आधीपासूनच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत जाण्याची तयारी केली होती हे आमच्या लक्षात आल्यामुळेच आम्ही इतर पर्यायांचा शोध घेत होतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपेक्षेप्रमाणे ही माहिती नाकारली आहे. देवेंद्र फडणवीस हे असत्यावर आधारित विधाने करत आहेत, अशा प्रकारची थेट प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. राज्यात काही ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे वारे वाहत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक हा विषय समोर आणल्याची टीकाही केली जात आहे. या पहाटेच्या शपथविधीबाबत अशा प्रकारची उलटसुलट माहिती प्रसिद्ध होत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दीर्घकाळ कारावासात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती, अशी माहिती दिली आहे. तथाकथित आर्थिक घोटाळ्यांच्या निमित्ताने एक वर्षापेक्षा जास्त काळ कारावासात असलेल्या अनिल देशमुख यांनी कारावासातून सुटका झाल्यानंतर ही माहिती दिली आहे, हेसुद्धा महत्त्वाचे मानावे लागेल.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणते वचन दिले होते याबाबतसुद्धा आता गौप्यस्फोटाच्या निमित्ताने उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती शिवसेनेतर्फे नेहमीच देण्यात येते. पण अशा प्रकारचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते असे भाजपातर्फे नेहमीच सांगण्यात येते. गेल्या काही दिवसांत घडलेल्या सर्व घटना आणि घडामोडी पाहता राजकारणी लोकांना आता वर्तमानातील राजकीय फायदा लक्षात घेऊन भूतकाळातील काही गोष्टी समोर आणण्याची गरज भासू लागली आहे, असे दिसते. जेव्हा एखादा राजकारणी नेता अशा प्रकारचा गौप्यस्फोट करतो आणि त्यातून समोर आलेली माहिती समोरचा नेता नाकारतो तेव्हा दोघांपैकी कोणीतरी एक खोटे बोलत असतो किंवा आपल्या सोयीने माहिती देत असतो. राजकारणामध्ये राजकीय नेत्यांना त्या त्या परिस्थितीप्रमाणे भूमिका घ्याव्या लागतात. जी भूमिका नंतरच्या कालावधीमध्ये योग्य वाटत नाही आणि टीकेस पात्र ठरते; पण त्या परिस्थितीला अनुसरून ती भूमिका घेतली होती, अशा प्रकारची कबुली नेत्यांकडून दिली जात नाही, हेसुद्धा तथ्य आहे.
2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आपली आघाडी भंग केली होती आणि त्याचवेळी भाजप आणि शिवसेना यांनी आपली युतीसुद्धा भंग केली होती. त्यानंतर जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये कोणत्याच एका राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तेव्हासुद्धा राज्यात स्थैर्य आणण्यासाठी आम्ही भाजपाला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो, अशा प्रकारची भूमिका घेतली होती. नंतर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा युतीचे सरकार स्थापन केले होते. सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा राज्यात राजकीय स्थैर्य प्रस्थापित व्हावे म्हणून काही कारणाने राजकीय नेते आपल्या भूमिका ठरवत असतात. एखाद्या विशिष्ट काळात घेतलेल्या अशा भूमिकेचा अर्थ नंतर बदललेल्या परिस्थितीमध्ये लावला तर विनाकारण राजकीय गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ज्या प्रकारे राजकीय गौप्यस्फोट करण्यात येत आहेत त्यामुळे ही अशी गोंधळाचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वकच करत असल्याने हे गौप्यस्फोट करण्यासाठीसुद्धा कोणतीतरी वेळ साधण्यात आली आहे, हेसुद्धा नाकारून चालणार नाही. फडणवीस आणि अजित पवार यांचा तो प्रसिद्ध पहाटेचा शपथविधी असो किंवा अनिल देशमुख आणि संजय राऊत यांचा कारावास असो किंवा उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेली ती तथाकथित बैठक असो या सर्व घडामोडींमध्ये निश्चित काय घडले याची माहिती संबंधित नेत्यांनाच असणार आहे, बाकी सर्व अंदाजच ठरणार आहेत. पण तरीही या सर्व गौप्यस्फोटाच्या निमित्ताने राजकीय वातावरण मात्र ढवळून निघणे अपरिहार्य आहे.