भाजपाच्या विजयाची पताका ज्या ज्या राज्यांत अद्याप फडकलेली नाही अशा राज्यांपैकी चटकन समोर येणारे नाव म्हणजे केरळ. आतातरी केरळमध्ये विजय मिळेल म्हणून भाजप जोर देत आहे. मात्र तेथे भाजपातील दुही उफाळून आली आहे.
सी व्होटरने केलेल्या ताज्या पाहणीत असे दिसून आले की, आज सार्वत्रिक निवडणुका झाल्यास, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पूर्ण बहुमत मिळेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूनही अबाधित आहे. या पाहणीमुळे भाजपच्या वर्तुळात आनंद व्यक्त करण्यात आला असला, तरीदेखील पक्षाचे शीर्ष नेतृत्व सावध आहे. याचे कारण, पक्षाच्या जागा काहीशा कमी होणार असल्याचा अंदाज असून, शिरोमणी अकाली दल, जनता दल संयुक्त आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे मोठे पक्ष आज रालोआ आघाडीत नाहीत.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, पक्षाच्या नेत्यांनी आत्मसंतुष्ट राहू नये आणि आगामी सर्वच्या सर्व निवडणुकांत संपूर्ण विजयी होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले होते. एवढेच नव्हे, तर मुस्लिमांपर्यंतही पक्ष पोहोचवा, अशी सूचना मोदी यांनी केली होती. पक्षाची शिस्त मोडून गटबाजीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये नेहमीच चाप लावला जातो. महाराष्ट्रात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना याचा अनुभव येत आहेच. याचे कारण, पक्षात आपल्याला महत्त्व मिळत नसल्याचे त्या वारंवार बोलून दाखवत असतात. सत्ता असलेल्या पक्षामध्ये पक्षांतर्गत मतभेद असणे स्वाभाविकच असते व भाजपही त्याला अपवाद नाही. गुजरात असो वा हिमाचल प्रदेश भाजपमधील गटातटाच्या राजकारणाचे दर्शन अलीकडेच घडले असून, केरळातही याचा प्रत्यय येत आहे.
भाजपचे केरळमधील प्रभारी प्रकाश जावडेकर हे असून, आगामी लोकसभा निवडणुकांत प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन हेच पक्षाचे नेतृत्व करतील, असे जावडेकर यांनी घोषित केले आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जावडेकर यांनी अचानक ही घोषणा केल्यामुळे केरळ भाजपात खळबळ माजली आहे. गंमत म्हणजे, केरळमधील भाजपच्या “जन्मभूमी’ या मुखपत्राने जावडेकर यांनी केलेल्या घोषणेची बातमीच दिली नाही. फेब्रुवारी महिन्यात सुरेंद्रन यांची अध्यक्षपदाची मुदत संपत असून, त्यानंतर दुसऱ्या कुणाची तरी या पदावर नेमणूक होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यांना कायम ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले असून, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांचे सुरेंद्रन हे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना कायम करण्यात आले आहे, असे सांगण्यात येते. भाजपचे संघटनात्मक राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचेही सुरेंद्रन यांना समर्थन आहे.
खरे तर, सुरेंद्रन यांनी अपेक्षित कामगिरी करून दाखवलेली नाही. केरळात साम्यवाद्यांची सत्ता उलथून टाकण्याच्या गर्जना करूनही, भाजपला ते अजिबात जमलेले नाही. पी. के. कृष्णदास हे 2006 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले, त्यावेळी व्ही. मुरलीधरन हे उपाध्यक्ष होते. केरळ भाजपमधील ज्येष्ठ नेते हे 2006 पासून प्रकाशात आले आहेत. त्यावेळी पी. पी. मुकुंदन हे राज्य सरचिटणीस होते आणि ए. एन. राधाकृष्णन, एम. पी. रमेश, सोभा सुरेंद्रन आणि के. सुरेंद्रन हेही नेते तेव्हा पुढे आले. ओ. राजागोपाल आणि के. रमण पिल्लई या नेत्यांच्या विरोधात उपरोल्ल्लेखित नेत्यांनी दबाव गट स्थापन केला. मुकुंदन यांची सरचिटणीस पदावरून रा. स्व. संघाने हकालपट्टी केली. तर 2010 साली कृष्णदास यांच्या जागी मुरलीधरन यांची नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत.
मुरलीधरन हे दशकभर मुंबई आणि दिल्लीत कार्यरत होते आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व संतोष यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहे. म्हणूनच केरळमधील भाजपबाबत कोणताही निर्णय घेताना मुरलीधरन यांचे मत विचारात घेतले जातेच. सुरेंद्रन हे जाणीवपूर्वक मुरलीधरन यांच्या गटात राहिले आहेत. जावडेकर यांची केरळच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर सुरुवातीला सुरेंद्रन यांचे विरोधक खुशीची गाजरे खात होते. परंतु सुरेंद्रन यांचे हात बळकट करण्याचे कामच आपल्याला देण्यात आले आहे, हे जावडेकरांनी स्पष्ट केले. मात्र भाजप श्रेष्ठींपुढे चांगले पर्यायही उपलब्ध नाहीत.
प्रसिद्ध कलावंत सुरेश गोपी याचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी घेतले जात होते. पण त्यालाच त्यात रस नाही. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा “एशिया नेट न्यूज’ हा चॅनेल आहे. या चॅनेलमधून सुरेंद्रन यांना नेहमीच लक्ष्य करण्यात येते. चंद्रशेखर यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. सध्याच्या सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने “एशिया नेट न्यूज’वर बहिष्कारच टाकला आहे. 2018-19 साली शबरीमल मंदिरातील प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात भाजपने आंदोलन केले होते. तेव्हा हिंदुत्वाचा पोस्टर बॉय म्हणून सुरेंद्रन यांचे नाव झळकू लागले.
2020च्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांत भाजपने 15 टक्के अशी चांगल्यापैकी मते मिळवली. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपच्या मतांचा हिस्सा चार टक्क्यांनी घटला आणि 2016 मध्ये पक्षाला जी एकमेव जागा मिळाली होती, तीही गमवावी लागली. त्यावेळी सुरेंद्रन यांच्या हकालपट्टीची मागणी होऊ लागली. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेंद्रन यांनी कोन्नी आणि मंजेश्वर या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली, त्याबद्दलही नाराजी प्रदर्शित करण्यात आली. मंजेश्वर येथून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने, लढतीतून माघार घ्यावी म्हणून सुरेंद्रन यांनी लाच दिल्याचा आरोप असून, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.
रालोआचे उमेदवार आणि आदिवासी नेते सी. के. जानू यांनाही सुरेंद्रन यांनी पैसे चारल्याचा आरोप असून, त्याबद्दलच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. याखेरीज, सुरेंद्रन यांच्या जहाल हिंदुत्वास विरोध करणारा गटही पक्षात सक्रिय आहे. केरळ भाजपातील या दुहीमुळे पक्षाच्या सहानुभूतीदारांनाही काळजी वाटणे स्वाभाविक आहे.