राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या बिहार राज्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचनाही जारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर तेथे सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्या राजकीयदृष्ट्या औत्सुक्याच्या आहेत.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि राजदच्या नेतृत्वाखालील आघाडी अशा दोन आघाड्यांमधील हा सामना आहे. तथापि या दोन्ही आघाड्यांमधील घटकपक्षांचे जागा वाटप हा त्यातील कळीचा मुद्दा आहे. तो लक्षात घेतला तर जागा वाटपाच्या संबंधात मुख्यमंत्री नितीशकुमार हेच सध्या पेचात सापडले असल्याची सध्याची स्थिती आहे. नितीशकुमार यांच्या आघाडीत एनडीएचा घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाला स्थान देण्यात आलेले नाही. किंबहुना आम्ही नितीशकुमारांच्या नेतृत्वाखालील आघाडीत निवडणुका लढणार नाही अशी घोषणा लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आधीच केली होती. त्यांनी आता नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू पक्ष जिथे उमेदवार उभे करणार आहे, त्याच मतदार संघात उमेदवार लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
भाजपनेही नितीशकुमार यांना सोडून देण्याचा विचार सुरू केला आहे काय, अशीही तेथे आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. लोकजनशक्ती पक्ष हा पूर्णपणे भाजपच्या नियंत्रणात असलेला पक्ष आहे. त्यांची बिहारमध्ये फार मोठी ताकद नसली तरी दुसऱ्या पक्षांचे गणित बिघडवण्याऐवढी त्यांची निश्चित क्षमता आहे. त्यांना स्वतंत्र निवडणुका लढवण्याची घोषणा भाजपनेच करायला लावली आहे, असे म्हणतात. नितीशकुमार यांची बिहारमध्ये प्रदीर्घ सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तेथे सध्या अँटी इन्कम्बन्सिची मोठी लाट आहे, त्याचा फटका आपल्याला बसायला नको म्हणून भाजपही आता नितीशकुमार यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगूनच पावले टाकत आहे.
सकृती दर्शनी जेडीयू आणि भाजपमध्ये 119-119 असे समसमान जागा वाटप झाले असले तरी ते जोरकसपणे पुढे नेण्यास भाजपचे बिहारमधील लोकही फार उत्सुक दिसत नाहीत. म्हणूनच त्यांनी लोकजनशक्ती पक्षालाही एनडीएतून बाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढवण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्यापुढे मोठंच त्रांगड निर्माण झाले आहे. “मोदी तुझसे बैर नही, नितीश तेरी खैर नही’ अशी घोषणा देणारे फलक राज्यभर उभारून लोकजनशक्ती पक्षाने तेथे प्रचारालाही प्रारंभ केला आहे. ही घोषणा राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारच्या विरोधात यशस्वीपणे चालली होती व तेथे वसुंधरा राजे सरकारचा दारूण पराभव झाला होता. असाच मोठा फटका आता या घटनेमुळे नितीशकुमार यांना बसतो की काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
सत्तारूढ आघाडीत या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे राजदच्या नेतृत्वाखालील आघाडीतही सुरुवातीला फार आलबेल चालल्याचे वातावरण नव्हते, पण नंतरच्या टप्प्यात मात्र त्यांनी चांगली एकजुट साधत जागा वाटप निश्चित केले आहे. तेजस्वी यादव यांनाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून त्यांनी जागा वाटपाबाबत राजद, कॉंग्रेस व डावी आघाडी यांच्यात यशस्वी तडतोड झाल्याचा देखावा निर्माण केला आहे. या आघाडीतील जागा वाटपात राजदने 144 जागांचा वाटा स्वत:कडे ठेवला आहे. इतका मोठा वाटा त्यांनी स्वत:कडे ठेवण्याने महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर झाली असणार; पण ती त्यांनी चव्हाट्यावर आणू दिली नाही, हा त्या आघाडीसाठीचा एक प्लस पॉइंट ठरणार आहे.
बिहारमधील ही निवडणूक देशाच्या सध्याच्या राजकारणाचा नेमका कल ध्वनित करणारी असेल. त्यामुळे या निवडणुकीला कधी नव्हे इतके महत्त्व आले आहे. अन्यथा नितीशकुमारांसाठी एरवी हा एकतर्फी मामला होता. त्यात आज भाजप इफेक्ट जोडला गेल्याने नितीशकुमारांचे गणित आणखी सोपे झाले आहे की, ते गणित केवळ भाजप इफेक्टमुळे बिघडणार आहे, हे या निवडणुकीतून सिद्ध होईल आणि त्यानंतर देशाच्या राजकारणाचे वारे पुढील साडेतीन वर्षे नेमक्या कोणत्या दिशेने वाहू लागतील त्याचे दिशा निर्देशन या निवडणुकीतून होईल. गेल्या निवडणुकीत राजद व कॉंग्रेस हे पक्ष बरोबर असल्याने बिहारमध्ये पुन्हा नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार येऊ शकले होते.
भाजपचा गेल्यावेळी तेथे दारूण पराभव झाला होता. पण नंतरच्या काळात राजद आणि जेडीयूमध्येच फाटाफूट झाल्याने निवडणुकीत पराभूत झालेली भाजप येथे नितीशकुमार यांच्याशी जवळीक साधून पुन्हा सत्ताधारी बनली होती, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. बिहारच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचेच प्राबल्य मोठे असले तरी त्यांना कॉंग्रेस किंवा भाजप या दोन्हीं राष्ट्रीय पक्षांचा मोठा हातभार असतो, हे मागील काही निवडणुकांमध्ये आपण पाहिले आहे. त्यामुळे देशात सध्या भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात जो सामना सुरू आहे त्याचे परिणाम या निवडणुकीतही दिसून येणार आहेत. म्हणूनच भाजपबरोबर गेलेली जेडीयू आणि राजद बरोबर गेलेली कॉंग्रेस यांच्यापैकी कोणाची सरशी तेथे होते, त्यातून देशात कोणत्या राजकीय पक्षाचा यापुढील काळात वरचष्मा राहील हे लक्षात येणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे.
कॉंग्रेस-राजद ही परंपरागत आघाडी आहे. पण मधल्या काळात मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपपासून दूूर गेलेले नितीशकुमार पुन्हा भाजपबरोबर गेले असल्याने त्यांच्यासाठीही कसोटीची निवडणूक आहे. भाजपला दूर करता येत नाही आणि त्यांच्याशी अधिक समरसून राजकारण करता येत नाही अशी नितीशकुमारांची तेथे गोची झाली आहे. तशातच भाजपने लोजपला स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सांगून नितीशकुमार यांच्यापुढेच त्रांगडी स्थिती निर्माण केली असल्याने बिहारमधील ही एनडीए आघाडी एकमेकांविषयीच्या संशयाच्या भूमिकेतूनच या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. यातून कोणत्या आघाडीचे नशिब फळफळणार हे आपल्याला चालू महिन्यात समजलेच; पण बिहारी जनतेचे नशिब कधी फळफळणार याचे उत्तर मात्र अजून कोणाकडेच नाही.
बिहार हा देशातला सर्वात मागास समजला जाणारा प्रदेश आहे. बऱ्यापैकी प्रभुत्व असतानाही नितीशकुमार येथील जनतेचे भाग्य बदलू शकले नव्हते, त्यांच्याकडून यापुढील काळात तरी भरीव कामगिरी होईल की नाही, हे सांगता येत नाही. भाजपसारख्या मोठ्या पक्षाची साथ असूनही त्याचा चांगला उपयोग नितीशकुमार यांना बिहारसाठी करून घेता आलेला नाही, ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करता येत नाही.
भाजपनेच साथ सोडली तर आता कोणाचा हात धरायचा ही नितीशकुमार यांच्यापुढील मोठी अडचण असणार आहे. तेथे कोणीही सत्तेवर येवो; पण बिहारी जनतेला बऱ्याच प्रतिक्षेनंतर खऱ्या अर्थाने चांगले दिवस येणे अधिक महत्त्वाचे आहे.