गळेकापू स्पर्धेच्या आजच्या युगात केवळ जगण्यासाठीच नव्हे तर जिवंत राहण्यासाठीही बरीच धडपड करावी लागते; कारण केसानं गळा कापणारे पदोपदी भेटतात. कुणी गळाभेट घेऊन खिसा कापतात तर कुणी खिशासाठी थेट गळाच कापतात. काहीजण तर केवळ आपली हौस म्हणून कुणाचाही गळा कापतात.
अवघ्या पाच वर्षांची एक पोर शाळेतून घरी येते आणि खेळता-खेळता अचानक गळ्यावर हात ठेवून काहीही न बोलता गप्प बसते. थोड्या वेळानं तिच्या गळ्यातून रक्त येताना दिसतं आणि निरखून पाहिल्यावर गळ्याभोवती आवळलेला मांजाचा फास दिसतो. ज्याचा पतंग कापला गेलाय, तो पलीकडून मांजा खेचत राहतो आणि इकडे या चिमुकलीच्या गळ्याची जखम अधिकाधिक खोल होत राहते. ती ना सांगू शकते, ना ओरडू शकते. गळ्यातून ओघळणाऱ्या रक्तानं तिचे कपडे माखलेले असतात. वेळेवर दवाखान्यात नेल्यामुळे तिचा जीव वाचतो; पण गळ्याला 26 टाके घालावे लागतात.
ही आहे नागपूरच्या लहानग्या शबनाजची कहाणी. गेल्या दहा-बारा दिवसांत असे अनेकजण जखमी झालेत. चार दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही एका विद्यार्थ्याचा गळा मांजाने कापला गेला. आदल्याच दिवशी नागपुरात दोन शिक्षक मांजाने कापल्यामुळे जखमी झाले. नाशकात तीन दिवसांपूर्वी मांजाने कापल्यामुळे एक शाळकरी मुलगा आणि एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अकोल्यातसुद्धा दुचाकीवरून आईसोबत जाणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलाच्या गळ्याभोवती मांजाचा जीवघेणा फास बसला.
आधीच अपुऱ्या असलेल्या आपल्या यंत्रणेला अशा किती बारीकसारीक गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागणार आहे, कोण जाणे! “केसानं गळा कापणे’ ही म्हण सत्यात उतरवणारा हा केसाइतका बारीक मांजा खरोखर आवश्यक आहे का? पतंग उडवणं महत्त्वाचं आहे की दुसऱ्याचा पतंग कापणं? संक्रांतीच्या निमित्तानं पतंगबाजी करण्याची परंपरा अनेक राज्यांत आहे. अर्थात महाराष्ट्रात ती पूर्वी फारशी नव्हती. “दांडिया’प्रमाणंच ही परंपराही राज्यात अनेक ठिकाणी हळूहळू रुजली. आपल्याकडे प्रत्येक परंपरेचं “शास्त्रीय विवेचन’ करणारे विद्वान असतातच. संक्रांतीला उत्तरायण सुरू होतं.
कडाक्याच्या थंडीमुळे या काळात त्वचा कोरडी पडते. कफाचं प्रमाण वाढतं. घराच्या छतावर उभं राहून ऊन खाल्ल्यामुळे या समस्या दूर होतात, असं सांगितलं जातं. पण ऊन खाताना पतंगच का उडवायला हवा? गच्चीवर पत्ते, कॅरम खेळलं तर चालणार नाही का? या प्रश्नाचं “शास्त्रीय’ उत्तर कुणी देत नाही. शरीराला व्हिटॅमिन-डी मिळण्यासाठी पतंग उडवणं हा एकमेव मार्ग आहे का, हे तपासायला हवं. शिवाय त्यासाठी एवढा धारदार मांजा, बंदी असलेला नायलॉन मांजा लागतो का? याचंही उत्तर मिळायला हवं. अशा गळेकापू मांजातून कुठलं व्हिटॅमिन शरीराला मिळत असेल?
सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा की, ज्याला कायद्यानं बंदी आहे, असा नायलॉन मांजा बाजारात मिळतोच कसा? सध्या तो ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातूनही मिळतो हे स्पष्ट झालंय. दरवर्षी इतके छापे घातले जातात, इतका मांजा जप्त केला जातो तरीही पुनःपुन्हा तो येतोच कसा आणि आला तरी वापरावा असं लोकांना वाटतंच कसं? शेकडो पक्षी मांजात गुंतून जखमी होतात, याची खंत कुणालाच कशी वाटत नाही? या “गळेकापू’ आनंदाला चाप लावलाच पाहिजे.