मूलभूत हक्कांपेक्षा कायदा अंमलबजावणी महत्त्वाची
पुणे, दि. 10 – घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार जर एखादा कायदा केला गेला असेल आणि या नवीन कायद्यामुळे मूलभूत हक्कांची गळचेपी होत असेल तर मूलभूत हक्क डावलून कायद्याचीच अंमलबजावणी करावयास हवी, असे प्रतिपादन कायदेपंडित एन. ए. पालखीवाला यांनी आज केले.
केंद्र सरकारच्या कायद्याला आव्हान द्यायचे असेल तर थेट सुप्रीम कोर्टाकडेच जावे लागणार. कामगारांना व्यवस्थापनात समाविष्ट करणे, वन्यपशूंचे संरक्षण आणि गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला, ही तीन मार्गदर्शक तत्त्वे सरकारने आपल्या घटनेत सामील केली.
भारतीय चित्रपटांची नेपाळला निर्यात
नवी दिल्ली – भारताकडून दरसाल 50 चित्रपटांची आयात करण्याबाबतचा एक करार करण्यास रॉयल नेपाळ फिल्म कॉर्पोरेशनने मान्यता दिली आहे. तसेच विविध देश भारतीय चित्रपट खरेदी करणार आहे. इराक, सीरिया, रुमानिया या देशांचे प्रतिनिधी चित्रपटांची निवड करण्यासाठी मुंबईला भेट देणार आहे.
युवकांनी संघटित व्हावे
पुणे – वीस कलमी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवकांनी आपली शक्ती संघटित करून प्राप्त काळाचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आज सभेत बोलताना केले.