“जल हैं तो जीवन हैं।’ हा विचार तर पाण्याच्या थेंबाचे मोल सांगायला पुरेसा आहे. पाण्याचेच दुसरे नाव आहे ते म्हणजेच जीवन. माणसाच्या जीवनाचा पाणी हा एक अविभाज्य घटक आहे. पाण्याशिवाय जीवनाला काहीच मोल नाही. कारण पाणी हे आपल्याला कशा कशाला म्हणून लागत नाही. अगदी मानवी देहाच्या शुद्धतेपासून ते शेतीवाडी, उद्योगधंदे, व्यवसाय या सर्वांसाठी, सर्वच ठिकाणी माणसाला पाणी हे हवेच असते.
पाणाचा प्रमुख स्रोत म्हणजे पावसाचे पाणी. ते पाणी सारी सृष्टी स्वच्छ करते, फुलविते, सुजलाम्, सुफलाम् बनविते. पाण्याचेही दोन प्रकार आहेत. एक खारे पाणी तर दुसरे गोडे पाणी. खाऱ्या पाण्याचा तर आपल्या समोर अथांग असा महासागर असतो. पण ते पाणी तहानलेल्या जीवाची तहान भागवत नाही. पाण्याची तहान हे झरे, ओढे, तलाव, विहीर, नदी यातील पाणीच भागवू शकते. यालाच भूजल असे म्हणतात. पाण्याची मुबलकता जिथे आहे तिथे सुकाळ असतो. याच्या उलट जिथे पाण्याचा अभाव तिथे दुष्काळ असतो.
पंच महाभूतातले एक तत्त्व म्हणून पाण्याची ओळख ही “आप’ म्हणून करून दिली जाते. पाणी हे केवळ मानवी जीवनात सुबत्ता किंवा सुकाळ आणून आपले पोषणच करत नाही, तर पाणी हे माणसाला बरंच काही सांगून आणि शिकवून जाते. त्या पाण्याकडून बरंच घेण्यासारखं आहे. पाण्याचे विविध गुणधर्म आहेत.
पाणी हे स्वत: निर्मळ असते आणि ते दुसऱ्यांनाही निर्मळ करते. सदैव प्रवाहित राहणे हा पाण्याचा गुणधर्म आहे. त्याच्या प्रवासात आलेल्या अडचणींना अर्थात दगड धोंड्यांना वळसा घालून ते नित्य प्रवाहित राहते.तहानलेल्या जीवाची तहान शांत करणे हे पाण्याचे महत्त्वाचे कार्य आहे. ते कार्य करीत असताना पाणी पिण्यासाठी आपल्या जवळ गाय आली आहे, का वाघ आला आहे, समोरील व्यक्ती ही सज्जन आहे का दुर्जन आहे, हे पहात नाही, तर ते दुसऱ्याची तहान भागविण्याचे आपले कार्य हे सदैव करतच असते.
पाणी हे नेहमीच पवित्र असते. ते तीर्थरूपाने दुर्जनांचाही उद्धार करते. पाण्याचा आणखी एक गुण म्हणजे त्याचे एकमेकांत मिसळून जाणे. त्याला स्वत:चा असा स्वतंत्र रंग नाही. तर पाणी हे ज्यात मिसळावे ते त्याचा रंग घेते. स्वत:चे अस्तित्व विसरून दुसऱ्याशी एकरूप होणे हा पाण्याचा गुण घेण्यासारखा आहे.