जागतिक मंदीच्या झळा सोसत भारतीय अर्थव्यवस्था मात्र चांगलीच तग धरून उभी आहे. यात नवउद्यमींचा चांगलाच हातभार लागत आहे, हे विशेष.
भारतातली नवोद्योगांचे किंवा स्टार्टअप्सचे बरेच गुणगान केले जात असले, तरी 2021च्या तुलनेत 2022 मध्ये या उद्योगाना 33 टक्के कमी भांडवल मिळाले. डॉलरच्या हिशेबात ही रक्कम 24 अब्ज इतकी होते. अर्थात, तरीही 2019 आणि 2020 या वर्षांच्या तुलनेत नवोद्योगांना दुप्पट निधी मिळाला, हे वास्तव आहे. पीडब्ल्यूसी इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, अगदी पहिल्या टप्प्यात नवोद्योगांना मिळणाऱ्या निधीत मात्र 2022 मध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली. याचा अर्थ भारतातली नवोद्योगांबाबत, विशेषकरून विदेशी गुंतवणूकदार अजूनही आशावादी आहेत.
एखादा तंत्रज्ञानप्रधान नवोद्योग सुरू होण्याच्या अत्यंत प्राथमिक टप्प्यात असतो, तेव्हा त्यास निधीची खूप गरज असते. 2021 आणि 2022 मध्ये नवोद्योगांना जे एकूण भांडवल मिळाले, त्यापैकी 60 टक्के निधी हा प्राथमिक टप्प्यातच मिळाला, ही समाधानाची बाब आहे. सरासरी प्रत्येक नवोद्योगास या टप्प्यात सरासरी 40 लाख डॉलर्स मिळाले. जगातील सर्वाधिक नवोद्योग हे अमेरिकेत आहेत. त्यानंतर चीनचा व नंतर भारताचा नंबर लागतो. 2022 साली भारतात 136 युनिकॉर्न कंपन्या होत्या. ज्या कंपन्यांचे मूल्यांकन 100 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त असते, त्यांना “युनिकॉर्न’ असे म्हणतात. परंतु या 136 युनिकॉर्न्समध्ये केवळ पाच महिला उद्योजकाच होत्या.
भारतात अजूनही खास करून, उत्तर भारतात व अन्यत्रही काही जागी स्त्री-पुरुष असमानता आहे. भारताच्या जनगणना विभागाच्या 2013 ते 2017 मधील अंदाजानुसार, देशात महिलांचे सरासरी आयुष्य 70 वर्षे, तर पुरुषांचे 67 वर्षे इतके आहे. दरवर्षी सरासरी एक लाख मुलांच्या जन्मामागे 130 महिलांचा मृत्यू होत असतो. अर्थात मुलगाच हवा, या धारणेतून स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत देशात काहीसे कमी झाले आहे. आर्थिक बाबींचा विचार करताना सामाजिक बाबीही विचारात घ्याव्या लागतात.
गर्भजल परीक्षणावर आणण्यात आलेली बंदी, “बेटी बचाव’ हे अभियान आणि साक्षरतेत वाढ यामुळे लिंगगुणोत्तर सुधारले आहे. या पार्श्वभूमीवर, अजूनही महिला उद्योजकांची संख्या कमी असणे आणि युनिकॉर्न्समध्येही महिलांचा वाटा अत्यल्प असणे, हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. सुमारे 45 वर्षांपूर्वी किरण मजुमदार-शॉ यांनी बंगळुरूमधील एका गॅरेजमध्ये “बायोकॉन’ या कंपनीची स्थापना केली. त्यांचे वडील रसेंद्र मजुमदार हे संयुक्त ब्रुवरीजचे मुख्य ब्रू-मास्टर होते. त्यांनीच किरण यांना आंबवणशास्त्र किंवा ब्रुइंगचे विज्ञान शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियात पाठवले. 1974 साली या कोर्ससाठी त्या एकमेव महिला विद्यार्थी होत्या.
किरण यांनी आधी कार्लटन आणि युनायटेड ब्रुवरीजमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आणि नंतर भारतात येऊन काही खासगी कंपन्यांत अनुभव घेतला. परंतु त्यांनी जेव्हा बंगळुरू किंवा दिल्लीत कामाची संधी मिळते का हे पाहिले, तेव्हा त्या महिला असल्यामुळे त्यांना कोणत्याही कंपनीत मास्टर-ब्रुअरर म्हणून काम मिळणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र हे एक आव्हानच समजून किरण यांनी केवळ दहा हजार रुपये भांडवलावर भाड्याच्या गॅरेजमध्ये बायोकॉनची स्थापना केली. कोणतीही बॅंक त्यांना कर्ज देण्यास तयार नव्हती. वैज्ञानिक कौशल्य असलेले कामगारही मिळत नव्हते. अशा अडचणींमधून किरण यांनी बायोकॉन ही एक महाकाय कंपनी बनवली आणि जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आज बायोकॉन ही कंपनी भारतात अग्रेसर असून, जगातील सर्वात शक्तिशाली महिला उद्योजक म्हणून किरण यांचा फोर्ब्स मासिकाकडून गौरव झाला आहे.
इतक्या वर्षांनंतर आजही पहिल्या पिढीतील महिला उद्योजकांना व्यवसायाचे ज्ञान, कायदे आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोच. सात वर्षांपूर्वी चेन्नई येथील हरिणी शिवकुमार यांचे 22व्या वर्षी लग्न झाले. त्यांचा मुलगा “डाउन्स सिंड्रोम’ असलेला आहे. त्वचारोगही असल्यामुळे त्यांचा हा लहान मुलगा बाहेरचे साबणही वापरू शकत नव्हता. अशावेळी हरिणी यांनी घरच्या घरी साबण बनवायला सुरुवात केली आणि या साबणांना खूप मागणीही यायला लागली. हरिणी यांनी मग “अर्थ ऱ्हिदम’ या नावाने स्टार्टअपच सुरू केला. त्यांनी शेळीच्या दुधापासून बनवलेले साबण, बॉडी बटर लोशन्स आणि पुनर्वापर करता येऊ शकतील अशा मेकअप रिमूव्हर्सचे उत्पादन सुरू केले. आज या कंपनीची उलाढाल 200 कोटी रुपयांची असून, “नायका’सारख्या कंपनीने त्यात गुंतवणूक केली आहे.
उत्तराखंड येथील मीनाक्षी खाती यांचे वय अवघे 24 वर्षांचे आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी केवळ 50 हजार रुपयांच्या भांडवलावर “मीनाकृती’ ही कंपनी सुरू केली. ही कंपनी कोस्टर्स, कार्डस, पिशव्या आणि मुख्यतः उत्तराखंडमधील “ऐपण’ शैलीच्या चित्रांनी सजवलेल्या वस्तू विकते. कंपनीची वार्षिक उलाढाल 15 लाख रुपयांची आहे. वारली आणि मधुबनी चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच पद्धतीने उत्तराखंडमधील ऐपण या लोककलेचा प्रसार व्हावा, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. कीर्तिप्रिया या तीस वर्षांच्या स्त्रीने तेलंगणमधील थोंडा या दुर्गम भागातील खेड्यात “नर्चर फिल्ड्स इंडस्ट्रीज’ हा प्रकल्प स्थापन केला. “ओह फूड्स डॉट इन’ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही कंपनी भाज्यांच्या निर्जलीकृत पावडरी विकते. त्यांच्या प्रकल्पात बहुसंख्य महिला कर्मचारीच आहेत. ग्रामीण भागातही उत्तम व्यवसाय करून रोजगारनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
मुंबईतील श्वेता तिवारी या एका जाहिरात संस्थेत कलासंचालक म्हणून काम करत होत्या. त्यांनी 2014 साली बिहारमधील गया या आपल्या मातृभूमीत “चुंगी स्टोअर डॉटकॉम’ ही कंपनी स्थापन केली. बंगाल व बिहारमधील कारागीर व विणकरांनी बनवलेल्या घरगुती शोभेच्या वस्तूंचे उत्पादन व विक्री हे या कंपनीचे ध्येय आहे. या कंपनीत 45 स्त्रिया काम करतात आणि कंपनी प्रगतीपथावर आहे. अनंत समस्यांचा मुकाबला करत भारतात महिलांचे नवोद्योग फोफावत आहेत, ही आनंदाचीच गोष्ट आहे.