काश्मिरात परवा आणखी एका काश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे. संजय शर्मा असे या हत्या झालेल्या चाळीस वर्षीय इसमाचे नाव आहे. हा अत्यंत गरीब व सामान्य घरातील निष्पाप नागरिक काश्मीर खोऱ्यात अजूनही कार्यरत असलेल्या दहशतवादाचा नवा बळी ठरला आहे.
एका बॅंकेच्या एटीएमवर तो गार्ड म्हणून काम करीत होता. पुलवामा जिल्ह्यातील त्याच्या घराजवळ दहशतवाद्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून त्याची हत्या केली आहे. या घटनेने सारे काश्मीर हळहळले. अगदी ज्यांना फुटीरवादी म्हणून संबोधले जाते त्या हुर्रियत कॉन्फरन्सनेही या हत्येचा निषेध केला आहे. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर फारूख आदी तेथील मुख्य प्रवाहातील राजकीय नेत्यांनीही या हत्येचा निषेध केला आहे; यातील अनेक जणांनी शर्मा यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचे काम केले आहे.
माजी मुख्यमंत्री मेहबुबा याही त्यांच्या घरी गेल्या होत्या. वास्तविक धर्माच्याच भाषेत बोलायचे तर हे सारे मुस्लीम समाजातील नेते आहेत, त्यांनी काश्मिरी पंडितांवर सातत्याने होणाऱ्या या अत्याचाराविषयी हळूहळू बोलण्याला महत्त्व आहे. या कुटुंबीयांना भेटून आल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारला एक रास्त सवाल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काश्मिरातील दहशतवाद संपून येथे सुरळीत स्थिती निर्माण झाल्याचा दावा सरकार सातत्याने करीत आहे, असे जर असेल तर मग या हत्या कोण करतंय, असा टोकदार सवाल त्यांनी केला आहे.
मेहबुबा यांनी संजय शर्मा यांच्या पत्नीला सरकारने त्वरित नोकरी द्यावी, अशी मागणी केली आहे, त्यांनी म्हटले आहे की, या दाम्पत्याला तीन लहान मुले आहेत, आता संजय शर्मा यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गमावला आहे. त्यामुळे त्या परिवाराच्या चरितार्थाचाच प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांच्या पत्नीला सरकारने नोकरी देण्याची गरज आहे, त्यांच्या या संवेदनशील वक्तव्याने काश्मिरातील हिंदु-मुस्लीम सौहार्दाचे वातावरण कायम राखण्याचा प्रयत्न तेथील धर्माने मुस्लीम असलेले नेतेही करीत आहेत. हुर्रियत कॉन्फरन्सच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात हीच भावना आहे. त्यांनी म्हटले आहे की एकीकडे सरकार टोकाची दडपशाही करून येथील जनतेचा आवाज दाबून टाकत असून त्यांच्यावर बळाचा वापर करून अत्याचार केले जात आहेत आणि दुसरीकडे त्याला प्रत्युत्तर म्हणून तितक्याच टोकाच्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत. काश्मिरी जनता या दोघांच्या कचाट्यात सापडल्याची असहायता हुर्रियत कॉन्फरन्सच्या मिरवैज उमर फारूख यांच्या गटाने व्यक्त केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनीही संजय शर्मांच्या हत्येबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. त्यामुळे काश्मिरातील स्थितीला केवळ हिंदू-मुस्लीम परिमाण नाही हे अगदी स्पष्ट आहे.
काश्मिरात अलीकडच्या काळात अनेक हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. दहशतवाद्यांनी सरकारी कचेरीत काम करणारे हिंदू कर्मचारी आणि शिक्षक यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन टिपले आहे. काश्मिरात काम करणारे स्थलांतरित हिंदू मजूरही या दहशतवादाचे बळी ठरले आहेत. सरकारने दहशतवाद संपल्याचा कितीही दावा केला असला, तरी अजून या दहशतवादाची नांगी तेथे वळवळतानाच दिसते आहे. हा गंभीर मामला आहे. अगदी नेमक्या भाषेत सांगायचे तर केंद्रात हिंदुत्वाची भाषा करणारे सरकार सत्तेवर आले असतानाही काश्मिरातील हिंदूंची स्थिती सुधारली असल्याचे दिसत नाही. उलट पक्षी आता तर काश्मीर खोऱ्यात पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत ज्या हिंदूंना काश्मीर खोऱ्यात नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या जम्मू विभागात सरसकट बदल्या करा, अशी मागणी केली आहे. पण त्यांच्या मागणीला सरकारने धूप घातलेली नाही. या लोकांच्या डोक्यावर मृत्यू घोंघावत असल्याने अनेकांनी काश्मीर खोऱ्यातून आपला बाडबिस्तारा जम्मूला नेऊन ठेवला आहे. अजूनही हे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसतात. म्हणजेच हिंदूंच्या स्थितीत पूर्ण सुधारणा झालेली दिसत नाही हे अगदी स्पष्ट आहे.
काश्मिरातील दहशतवादाच्या बाबतीत सरकारने कडक धोरण अवलंबले पाहिजे ही मागणी केंद्रातील भाजप सरकारने आणि राज्यातील प्रशासनाने बऱ्याच अंशी पूर्ण केली आहे, हे जरी खरे असले तरी दहशतवादाचे आव्हान पूर्ण संपलेले नाही, ते संपले असल्याचा देखावा निर्माण करण्यात काही अर्थ नाही, हेच संजय शर्मा यांच्या हत्येमुळे स्पष्ट झालेले आहे. लष्कर आणि अन्य सुरक्षादले दहशतवाद्यांचा माग काढून त्यांना सातत्याने नेस्तानबुत करीत आहेत. पण पुनःपुन्हा तेथे अशा प्रकारचे आव्हान निर्माण होत असेल, तर लोकांच्या मनातील भीती कधी कमी होणार हा प्रश्न आहे. काश्मिरी जनतेच्या रेट्यामुळे तेथे पर्यटकांवर होणारे दहशतवाद्यांचे हल्ले पूर्ण थांबले आहेत. त्यामुळे तेथील पर्यटकांचा ओघ वाढला आहे. याच बाबीवरून काश्मिरातील स्थिती कमालीची सुरळीत झाल्याचे सरकार भांडवल करताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका वढेरा काश्मिरात बर्फात खेळतानाचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. त्याचेही भाजपने भांडवल केले आणि आमच्यामुळे काश्मिरातील स्थिती इतकी सुधारली आहे की आता राहुल आणि प्रियंका यांना काश्मिरातील बर्फात मुक्तपणे खेळायला मिळते आहे, अशी फुशारकी मारली गेली. पण भाजप व सरकारच्या या दाव्यांना पुनःपुन्हा होणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या हत्येने छेद जातो आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. मोदी सरकारच्याच काळात उरी, पठाणकोट आणि पुलवामा येथे मोठे दहशतवादी हल्ले झाले होते ही स्थितीही दुर्लक्षित करता येत नाही. त्यामुळे काश्मिरातील दहशतवाद हा राजकीय भांडवल करण्याचा विषय नाही, तर तो गांभीर्याने हाताळण्याचा विषय आहे, ही बाब अधोरेखित होते.