– अरूण गोखले
माणूस हा मानवी जीवन सागरातल्या एखाद्या माशासारखा आहे. मासा हा जसा पाण्याच्या बाहेर काढला तर तो जसा फार वेळ जगू शकत नाही. त्याप्रमाणेच या जीवरूपी माशालाही त्या संसार प्रपंच्याच्या भवसागरातून बाहेर पडायचे म्हटले, तर ते त्याला नकोसे वाटते. त्याचा जीव हा त्या क्षणिक सुखातच रमलेला असतो.
मासा हा एक अत्यंत छोटासा जीव. पण तोदेखील आपण आपल्या निरीक्षण, अध्ययन काळात गुरू म्हणून का निवडला. आपण त्याच्याकडून काय शिकलो, हे सांगताना स्वत: गुरूंचेही परम गुरू असलेले श्री दत्तात्रय असे सांगतात की- “माते! मी माझ्या चोवीस गुरूंमध्ये त्या पाण्यातल्या माशालाही गुरू केले. कारण त्याच्याकडून मला ही शिकवण मिळाली की, ज्याप्रमाणे माशाला पाण्याबाहेर काढताच तो घाबराघुबरा होतो. त्याचा जीव तडफडायला लागतो. तसे गुरूचे छत्र हे जरा का इकडे तिकडे झाले तर जीवास असेच वाटायला हवे.
मासा हा ज्याप्रमाणे खोल पाण्यात आहे तोवर तो सुरक्षित असतो. त्या प्रमाणेच गुरूच्या कृपेत आणि नामाच्या साधनेत जीव रमलेला असेल तोवर तो या बाह्य गोष्टीच्या मोहरूपी गळास भुलत नाही. त्याकडे धाव घेत नाही तो वरच स्थिर आणि सुरक्षित असतो.
जर का काळरूपी धीवराने टाकलेल्या या भवनदीतील मायामोहाच्या जाळ्यात जीव अडकला. जर जीवरूपी मीन हा धन, कामना, वासना या मोहाच्या गळास भुलून त्याच्याकडे धावला, तर तो जीवघेणा गळ त्याच्या तोंडाला लागतो. त्यात तो अडकतो आणि अखेर त्या मोहापायीच त्याचा बळीही जातो.
जीवास जीवनात असे मोहाचे गळ त्याला वारंवार खुणावत असतात. त्याच्या स्थिर मनोवृत्तींना अस्थिर आणि चंचल करीत असतात. फसवे सुखाचे क्षण त्याला खुणावत असतात. त्या सर्वांपासून त्याने सतत सतर्कतेने सावध आणि दूर राहावे लागते. मोहापासून दूर राहण्यातच त्याचे खरे कल्याण असते.
ज्याला या जीवाची सार्थकता साधायची असेल, या काळधीवरापासून लांब राहायचे असेल, तर त्याने त्यापासून दूरच राहण्यात त्याचे हित आहे. कारण अग्नी आणि लोणी हे जोवर एकमेकांपासून दूर आहेत तोवरच लोण्याचे स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकून असते, हे लक्षात घ्यायला हवे आणि ज्याने त्याने ती सावधानता राखायला हवी.