कामगार धोरणाबाबत इंटकचे निवेदन सादर
मदुराई, ता. 17 – कामगार धोरणाबाबत पहिल्या दोन योजनात ज्या गोष्टी अपुऱ्या राहिल्या त्या पुऱ्या करण्यावर तिसऱ्या योजनेत भर दिला पाहिजे असे इंडियन नॅशनल ट्रेड यूनिअन कॉंग्रेसने कामगार मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात सुचविले आहे. रास्त व गरजांवर आधारलेले किमान वेतन, कामगारांना व्यवस्थेत सहभागी करून घेणे आणि कामगार तंट्याचा त्वरित व अखेरचा निकाल घडवून आणणे याविषयी तिसऱ्या योजनेत कामगार धोरणावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनातील इतर महत्त्वाचे मुद्दे असे आहेत, अन्नधान्याच्या किमतींबाबत मदत देऊन कामगारांच्या खिशावर पडणारा ताण वाचविणे; बोनसचे प्रमाण, कसोटी ठरविण्यासाठी बोनसमंडळ नेमणे, सरकारी, सहकारी व खासगी व्यवसाय यांना एकच समान कामगार धोरण राखणे.
परराष्ट्रीय धोरणाबाबत लोकसभेत पंतप्रधान नेहरू यांनी दिलेले उत्तर
नवी दिल्ली – “भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडत्व यांना बाधा आल्यामुळे चीनने भारतीय प्रदेशात केलेले अतिक्रमण हा फार महत्त्वाचा प्रश्न बनला आहे’, असे पंतप्रधान पं. नेहरू यांनी आज लोकसभेत सांगितले. परराष्ट्रीय धोरणावरील चर्चेला ते उत्तर देत होते. ते म्हणाले की, पूर्वीपेक्षा शिखर परिषदेच्या यशाची आशा आता या क्षणी अधिक आहे. अलीकडच्याच काही घटनांनी मात्र त्या आशेवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
दुसऱ्या युद्धाची आठवण देणाऱ्या काही शक्तींचा (लष्करशाही) पुन्हा उदय होत असून त्या आपले अस्तित्व भासवू लागल्या आहेत. शिखर परिषदेमधील वाटाघाटीतून काही तरी बरे निघेल; अणुअस्त्रांची बंदी, निःशस्त्रीकरण वगैरे बाबत या वाटाघाटीतून काही तरी चांगले निष्पन्न होईल अशी आपण आशा करू या.