– हिमांशू
“समर्थाघरचे श्वान, त्याला सर्वच देती मान’ असं म्हटलं जात असल्यामुळे समाजातल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न गटातील लोकांघरची पाळीव कुत्री एकतर प्रचंड आक्रमक असतात किंवा प्रचंड आळशी! परंतु त्यात त्यांचा दोष नसतो. सतत बांधून ठेवलेली कुत्री वैतागून-वैतागून अखेर आक्रमक बनतात. ज्यांच्या घराची राखण करायला कुत्र्यांबरोबरच माणसंदेखील तैनात केली जातात, त्या घरातल्या कुत्र्यांना कामच मिळत नसल्यामुळे खाऊन-पिऊन ती सुस्तावत असावीत. अशी कुत्री बऱ्याच वेळा लोळत पडलेली दिसतात आणि अनोळखी माणूस (अगदी चोरसुद्धा) अनेकदा विनासायास घरात शिरतो.
काहींच्या बंगल्यात दोन-तीन कुत्री दिसतात; पण त्यातलं एकही राखणीसाठी नियुक्तीला नसावं आणि त्यांना वेगळीच कामं नेमून दिली असावीत, अशी शंका येते. काही कुत्री केवळ त्यांच्या “डिजिटल डॉल्बी’ आवाजासाठी पाळली जातात. परंतु तीसुद्धा आपला आवाज संपूर्ण परिसर निद्राधीन झाल्यावरच ऐकवायला सुरुवात करतात. अशी कुत्री पाळणं अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना परवडत नाही, कारण सोसायटीकडे तक्रारी जातात आणि मीटिंग बसते.
अनेकांची कुत्री प्रमाणापेक्षा खूपच लहान आकाराची असतात आणि अशा घरांमध्ये कुत्रा पाळण्यामागचा मुख्य उद्देशच साध्य होत नाही. काही कुत्री मात्र केवळ त्यांच्या दातांसाठीच प्रसिद्ध असतात. कागदाच्या गठ्ठ्याला स्टेपलर मारावा, इतक्या भयंकर रीतीनं ही कुत्री अनेकांचा चावा घेतात. दर आठवड्याला ही कुत्री भांडण घेऊनच घरात येतात.
अर्थात, कुत्रा चावला या कारणासाठी झालेलं भांडण हा काही कोर्टात नेण्याचा विषय नाही, असंच बहुतेकांना वाटतं. त्यामुळेच कुत्र्यांचे मालक निर्धास्त राहतात आणि त्यातले अनेकजण आपल्या कुत्र्याला अधिकाधिक “कडक’ बनवण्याचा खटाटोप करतात. परंतु “समर्थाघरचं श्वान’ म्हणून प्रत्येक माणूस त्याला मान देतोच असं नाही. एखादा अखेरपर्यंत खिंड लढवतो. नागपूरमधल्या कोर्टानं अशाच एका कुत्र्याच्या मालकिणीला नुकतीच सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षाही ठोठावलीय. या महिलेचा कुत्रा एका नऊ वर्षांच्या मुलाला 2014 मध्ये चावला होता आणि मुलाच्या आईनं कुत्र्याच्या मालकिणीवर खटला दाखल केला होता.
कुत्रा पाळणाऱ्याला त्याच्यावर नियंत्रण ठेवता आलंच पाहिजे आणि पाळलेला कुत्रा कुणालाही विनाकारण चावत सुटलाय असं होता कामा नये. कोर्टाचा निकाल साधारण याच सिद्धांताच्या दिशेनं जाणारा आहे. अशा घटनेसाठी भारतीय दंडविधान आणि फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलमं बहुधा प्रथमच लावली गेली असावीत. “समर्थाघरचं श्वान’ असायला हरकत नाही; पण मालक आणि कुत्रा यांच्यात अधिक सामर्थ्यवान कोण, असा प्रश्न पडता कामा नये, हे स्पष्ट करण्याची जिद्द दिसत असल्यामुळे तक्रारदार महिलेला खटल्यात मिळालेलं यश महत्त्वाचं आहे.
कुत्रा चावण्याच्या प्रकरणात जाबजबाब, एफआयआर, तपास, आरोपपत्र, खटला आणि निकाल असा सुमारे सात वर्षांचा प्रदीर्घ प्रवास अभावानंच दिसतो; परंतु कोणताही पाळीव प्राणी आपल्या नियंत्रणात असावा, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. दंडाची रक्कम फिर्यादीला देण्याचा आदेश कोर्टानं दिलाय. दंड दिला नाही तर तुरुंगवास सहा महिन्यांनी वाढेल असंही म्हटलंय. परंतु एखाद्याला अशी फिर्याद नोंदवावी लागणंच मुळात दुर्दैवी आहे. असो, उपरोक्त “दंत’कथेत कुणी रूपकं वगैरे शोधू नयेत, ही विनंती!