करोना आता देशाच्या ग्रामीण भागातही वेगाने पसरू लागला आहे. भारतात 6 लाख 49 हजार 481 गावे आहेत आणि देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागातच राहते. करोनाच्या बाबतीत गावातील लोक सुरक्षित आहेत, असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु गेल्या सुमारे 15 दिवसांपासून गावांमधील मृतांचा आकडा चकित करणारा आहे.
गावात राहणाऱ्यांची रोगप्रतिकार शक्ती शहरी लोकांच्या तुलनेत खूपच चांगली असते, असे मानले जाते. परंतु गेल्या काही दिवसांत खेड्यांमधील करोनाबाधितांची संख्या शहरांमधील बाधितांच्या संख्येशी बरोबरी करताना तर काही जिल्ह्यांत पुढेही जाताना दिसत आहे. त्याबरोबरच आणखी एक संकट असे की, गावातील लोक बोगस डॉक्टरांच्या फेऱ्यात अडकू लागले आहेत. अर्थात, या लोकांनी अखेर करायचे तरी काय, असाच प्रश्न आहे. कारण त्यांच्या आसपास आरोग्यसेवा करोनावर उपचार करण्याइतक्या चांगल्या नाहीत. शिवाय, गरिबी आणि माहितीचा अभाव यामुळेही या लोकांचे अधिक हाल होत आहेत. एकीकडे अशा घटना घडत असताना दुसरीकडे राजस्थानातून अत्यंत हृदयद्रावक बातमी ऐकायला मिळाली. घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणादरम्यान राजस्थानातील खेड्यांत राहणारे सात लाखांहून अधिक लोक करोना पॉझिटिव्ह आढळले.
ग्रेटर नोएडाच्या खुर्दपूर गुज्जर गावातही लोक गर्दीचे कारण सांगून रुग्णालयात जाणे टाळत आहेत आणि गेल्या वीस दिवसांत गावात चाळीस मृत्यू झाले आहेत. याखेरीज कानपूर जिल्ह्यातील घामटपूरच्या आसपासची गावे संसर्गाने इतकी ग्रस्त झाली आहेत, की गेल्या 25 दिवसांत गावात सत्तरपेक्षा अधिक गावकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. प्रत्येक घरात ताप आणि खोकल्याचे रुग्ण आहेत. अनेक ठिकाणी कुटुंबेच्या कुटुंबे तापाने फणफणली आहेत. सर्व रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसत आहेत. करोनाच्या प्रसाराचा वाढता वेग पाहून गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. जर करोना याच गतीने ग्रामीण भागात पसरत राहिला तर निम्मा देश संसर्गग्रस्त होईल. कारण दोन तृतीयांश लोकसंख्या खेड्यातच राहते. गावांमध्ये चांगले उपचार मिळणे शक्य नाही, त्यामुळेही हाल वाढण्याची चिन्हे आहेत. शहरांची परिस्थिती पाहून आधीच लोक घाबरले आहेत. एकूणच सगळाच रामभरोसे कारभार आहे. जो घाबरला तो गेला अशी भावनाही दृढ झाल्यामुळे अरोग्य केंद्रांकडे पाठ फिरवली जाते आहे. समजा तेथे कोणी गेलेच तर तेथील स्थिती पाहून भीतीनेच मरण्याचे प्रकारही घडत आहेत.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठा कृती कार्यक्रम आखण्याची आणि राबविण्याची गरज आहे. भारतात आतापर्यंत करोनाचे सुमारे अडीच कोटी रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत सुमारे तीन लाखांच्या आसपास लोकांनी प्राण गमावले आहेत. हा अशा रुग्णांचा आकडा आहे, जो सरकारकडून दाखविण्यात आला आहे. ज्यांना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशांचा यात समावेश नाही. काही दिवसांपूर्वीच गंगा नदीत सुमारे दोनशे मृतदेह तरंगताना आढळून आले आणि ते पाहून लोकांमध्ये घबराट पसरली. प्रत्येक जण या घटनेचा अर्थ आपापल्या परीने लावू लागला. परंतु स्मशान घाट आणि कब्रस्तानात मृतदेहांवर दहन वा दफन संस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. बहुतांश स्मशाने नदीकिनाऱ्याजवळ असतात. अनेकजण मृतदेह तसाच नदीत सोडून देतात. काही जणांकडे आपल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले, असेही दिसून आले आहे.
महानगरांच्या आकडेवारीचा विचार करता दिल्लीत दोन तीन दिवसांपूर्वी पर्यंत साडेतेरा लाख रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये हजारोंच्या संख्येने आतापर्यंत मृत्यू झाले आहेत. अनेक रूग्ण अजून अत्यवस्थ आहेत. हे सगळे सांगण्याचा हेतू असा, की या राज्यांत इतर राज्यांच्या तुलनेत चांगल्या आरोग्यसुविधा आहेत आणि प्रचंड प्रयत्न करूनसुद्धा या राज्यांत करोनामुळे मृत्यू होत आहेत. या गणितात गावांमधील आकडेवारीचा समावेश केल्यास परिस्थिती स्फोटक बनू शकेल. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे देशातील सर्व गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. अनेक राज्यांतील गावांमध्ये लस घेणाऱ्यांची आकडेवारी जवळजवळ शून्य आहे, हे ऐकून निश्चितच आश्चर्य वाटेल. कारण एक तर ग्रामस्थांना यासंदर्भात जागरूक करणारे कुणी नाही आणि दुसरीकडे, त्यांनी स्वतः लसीकरणात रस घेतलेला नाही.
गावांमध्ये सॅनिटायझेशनचे कामही व्यवस्थित होत नाही. अजूनही सर्दी, खोकला, ताप आल्यास तो सामान्य ताप आहे असे मानून कोणत्यातरी डॉक्टरांकडून किंवा केमिस्टकडून औषधे आणून लोक घरातच उपचार घेत आहेत. त्यानंतर तब्येत अचानक बिघडल्यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. गावाकडील लोकांची अंतर्गत क्षमता शहरी लोकांच्या तुलनेत अधिक असते हे खरे आहे. परंतु करोना नावाच्या या विषाणूने सर्वांनाच सळो की पळो करून सोडले आहे. गावाकडील लोक साध्यासुध्या आजारपणावर उपचार घेत नाहीत, याचे कारण ते आतून सक्षम असतात. विशेष म्हणजे छोटे-मोठे आजार या लोकांना जास्त काही करूही शकत नाहीत. चांगले आणि देशी अन्न खाल्ल्यामुळे आणि शेतात मेहनत केल्यामुळे त्यांचे शरीर मजबूत राहते. परंतु करोनाच्या बाबतीत मात्र सगळेच लोक संकटात सापडले आहेत. तज्ज्ञ असे सांगतात की, करोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच त्याकडे दुर्लक्ष न करता चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
साधा खोकला किंवा ताप असेल तरीही करोनाची चाचणी करून त्या दिशेने उपचार सुरू करणे आवश्यक आहे. आपल्या मनाने किंवा केमिस्टला विचारून कोणतीही औषधे घेणे टाळायला हवे. मान्यताप्राप्त डॉक्टरकडूनच तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणेनेही ग्रामीण भागात अधिक सक्रिय झाले पाहिजे. सरकारी शाळा, महामंडळे आणि अन्य सरकारी कार्यालयांचे रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयांत करणे शक्य आहे. याखेरीज अशा स्थितीत ग्रामस्थांना अधिक जागरूक करण्याची आणि त्यांच्यासाठी ठोस धोरण आखण्याची गरज आहे. अन्यथा स्थिती भयावह बनू शकते.