मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सात ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात लवकरच अनेक राजकीय नेत्यांना ईडीकडून समन्स जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिक जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यात ईडीने जरंडेंश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. यानंतर इतर साखर कारखान्यांचा ईडीकडून तपास सुरु झाला आहे.
ईडीकडून याच अनुषंगाने गुरुवारी (2 सप्टेंबर) धाडसत्र राबवण्यात आले. ईडीकडून गुरुवारी सात ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची आता छाननी सुरु आहे. यानंतर आता संबंधितांना समन्स पाठवून बोलावले जाणार आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर ईडीने आता आपला मोर्चा महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळ्याकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे. या बॅंक घोटाळ्यात सुमारे 70 वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे आली आहेत. यापैकी काही जणांची चौकशी झाली आहे. लवकरच इतर नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.