छत्रपती संभाजीनगर – येथील घरकुल प्रकरणात ईडीने तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याचे समजते. या योजनेत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. घरकुल घोटाळा प्रकरणात ईडीने संभाजीनगरमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर मनपा अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सध्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
महापालिकेने पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेंतर्गत सुमारे 39 हजार घरांचा “डीपीआर’ तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. फेब्रुवारी 2022 मध्ये टेंडर निघाल्यानंतर समरथ मल्टिबीज इंडिया प्रा. लि., इंडग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंपन्यांनी एकाच “आयपी ऍड्रेस’वरून टेंडर भरले. यातून कोट्यवधींचा घोटाळा करण्याच्या ते तयारीत होते. या प्रक्रियेत कागदपत्रे सादर करताना पुण्याच्या न्याती कंपनीचे नाव जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीशी जोडण्यात आले. त्यामुळे मूळ न्याती कंपनीचे संचालक नितीन द्वारकादास न्याती, पीयूष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती यांना अनुक्रमे 16, 17 आणि 18 क्रमांकाचे आरोपी करण्यात आले.
देशात इतर ठिकाणी घरकुल बाबतची कामे वेगाने होत असताना छत्रपती संभाजी नगर मात्र याबाबतीत पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी माध्यमातून देखील चौकशी करण्यात येत आहे.
असे गोवले कंपनीचे नाव
टेंडरसाठी अर्ज करताना नहार बंधू व गुंजाळ याने जाणीवपूर्वक नामांकित कंपनी निवडली. न्याती कंपनीसोबत 2 मार्च तारखेचे 22 पानांचे नोटरी केलेले जॉइंट “व्हेंचर ऍग्रीमेंट’ बनविले. कंपनीच्या संचालकांच्या बनावट सह्या केल्या. मुळात 2 मार्च 2022 रोजी कंपनीचे संचालक दुबई येथे असताना शहरात त्यांच्या नावाने उपस्थित असल्याचे भासवून “बीफोर मी’ करत करार नोटराइज करण्यात आले. न्याती कंपनीने माहितीच्या आधारात ही सगळी कागदपत्रे मिळवून खासगी हस्ताक्षर तपासणी कंपनीकडून पडताळून घेतली असता सर्व सह्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कंपनीचे अधिकृत अधिकारी श्रीनिवास अय्यर यांनी आधी पोलिसांकडे तक्रार केली. नंतर न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी सहायक निरीक्षक सुनील कराळे अधिक तपास करत आहेत.