नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी अंधश्रद्धेच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटना केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार अशा दक्षिण आशियातील अन्य देशांमध्येही घडल्या. या सर्व देशांमध्ये भयंकर गरिबी आणि अशिक्षितपणा असल्यामुळे अंधश्रद्धाही अर्थातच अधिक आहेत. या देशांमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या गेलेल्या अंधश्रद्धेविषयीच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये सचित्र प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेक अंधश्रद्ध लोकांनी आपल्या अपंग मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत गाडून ठेवले. चेहरा सोडून संपूर्ण शरीर ग्रहणकाळात जमिनीत गाडल्यास अपंगत्व नाहिसे होते, अशी अनेकांची समजूत आजही आहे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. त्यांच्या समजुतीनुसार अपंगत्व ठीक झाले असण्याची शक्यता नाहीच; मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगातसुद्धा दक्षिण आशियातील हे देश भयावह अंधश्रद्धांनी ग्रस्त आहेत, ही मोठी समस्या म्हटली पाहिजे. दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर आदी मोजक्या देशांचा अपवाद वगळता संपूर्ण आशियात कोणत्या ना कोणत्या अंधश्रद्धा खोलवर रुजल्याचे पाहायला मिळते. अंधश्रद्धेवर आधारित एक अघोरी परंपरा आजही नेपाळमध्ये सुरू आहे. तिला “चौपदी’ असे म्हणतात.
या अंधश्रद्धेमुळे वयात आलेल्या अनेक मुली आणि महिला नेपाळमधील कडाक्याच्या थंडीत मृत्युमुखी पडतात. या कुप्रथेत वयात आलेल्या मुलींना आणि महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत त्यांच्या मूळ घराच्या बाहेर एका अत्यंत छोट्या झोपडीत राहण्यास भाग पाडले जाते. माती आणि दगडांनी ही झोपडी बनवलेली असते. मासिक पाळीचा कालावधी मुलींनी त्या झोपडीतच व्यतीत करायचा असतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि चुलीचा धूर यामुळे अनेक मुली आणि महिला या झोपडीतच अखेरचा श्वास घेतात. काही मुली आणि महिला साप चावल्यामुळे मृत्युमुखी पडतात. नेपाळमध्ये मुलांना किशोरावस्थेपासूनच “चौपदी’बाबत माहिती दिली जाते. मासिक पाळीच्या कालावधीत कोणत्याही महिलेशी कसल्याही प्रकारचा संपर्क आल्यास घरात दुर्भाग्य येते, असे शिकवले जाते.
हीच अंधश्रद्धा असंख्य नवयुवतींच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. ही कुप्रथा बंद करण्यासाठी नेपाळ सरकारकडून अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. परंतु तरीही नेपाळमधील दुर्गम क्षेत्रांमध्ये या क्रूर प्रथेमुळे आजही अनेक मुली हकनाक जीव गमावत आहेत. नेपाळ हा भारताच्या तुलनेत अविकसित देश आहे. भारताने तर अंतरिक्ष संशोधनाच्या क्षेत्रापासून अनेक क्षेत्रांत बरीच मोठी मजल मारली आहे. मात्र, तरीही पुत्रप्राप्तीसाठी नरबळी देण्यासारख्या अघोरी अंधश्रद्धा भारतात पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी लहान मुलांचा बळी दिला गेल्याच्या बातम्या नेहमी ऐकायला मिळतात. श्रद्धांच्या नावाखाली वैज्ञानिक युगातसुद्धा भारतात प्राचीन काळातील अनेक क्रूर प्रथा-परंपरा पाळल्या जातात. सर्वसामान्य जनतेबरोबरच सध्याचे राजकीय पक्षही श्रद्धेच्या नावाखाली अशा प्रथा-परंपरा सुरू ठेवण्याची आवाहने करतात आणि न्यायालयांनाही तशा आशयाची विनंती करतात, ही सर्वांत आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट आहे.
याचे सर्वांत ताजे उदाहरण म्हणजे, शबरीमला मंदिराचे प्रकरण. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भगवान अय्यप्पांचे दर्शन घेण्याचा सर्व महिलांना अधिकार असल्याचा निवाडा दिला होता. मात्र हा निर्णय बदलण्यासाठी सरकारनेच पुनर्विचार याचिका दाखल केली. समतामूलक आणि तर्कसंगत आधारावर दिलेला एक निवाडा बदलण्यासाठी श्रद्धेच्या नावाखाली पुनर्विचार याचिका दाखल होते आणि न्यायालयाकडून ती स्वीकारली जाते, याहून अधिक दुर्दैवी काय असू शकते! शनिशिंगणापूरमध्ये अशाच प्रकारची रूढी समाप्त करून शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. काही दर्ग्यांमध्येही महिलांना प्रवेशाची अनुमती देण्यात आली आहे. भूतान, चीन, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, मालदीव, फिलिपीन्स यांसह अनेक आशियाई देशांतील समाजात आज 21 व्या शतकातसुद्धा जुनाट अंधश्रद्धा आणि कुप्रथा पाळल्या जातात. अशा कुप्रथा आता दूर करायला हव्यात. भारतीय समाजाला अंधश्रद्धा, कुप्रथा आणि जुनाट रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी देशव्यापी जागरूकता मोहीम चालविली जाण्याची गरज आहे. या मोहिमेत सरकारबरोबरच सामाजिक संस्था-संघटनांची महत्त्वाची भूमिका असायला हवी.