Nepal Earthquake – नेपाळमध्ये आज बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामध्ये किमान 140 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी मोजली गेली.
भूकंपामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले असून सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. रात्री 11.47 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जजारकोट जिल्ह्यात, राजधानी काठमांडूच्या पश्चिमेला 500 किलोमीटर अंतरावर होता.
भूकंपाचे वृत्त समजताच नेपाळमधील लष्कराने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे, असे नेपाळच्या सैन्य दलाचे प्रवक्ते कृष्ण प्रसाद भंडारी यांनी सांगितले. नेपाळच्या पश्चिमेकडील जजारकोट आणि रुकुम जिल्ह्यांना भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
या दोन्ही जिल्ह्यांमधील मिळून भूकंपातील मृतांची संख्या 140 इतकी झाली आहे. तर तेवढेच लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे.
मृतांमध्ये जजारकोट येथील नालगंध महापालिकेच्या महापौर सरीता सिंह यांचाही समावेश आहे, असे पंतप्रधानांच्या सचिवालयाने म्हटले आहे. पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड यांनी आज सकाळी भूकंपग्रस्त भागाचा दौरा केला आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीच्या मदत आणि बचावकार्याच्या सूचनाही दिल्या.
भूकंपामुळे अनेक ठिकाणचे रस्ते आणि पूलांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांवरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी जाणाऱ्या पथकांच्या वाहतुकीमध्ये अडथळे येत आहेत.
2015 मध्ये आलेल्या भीषण भूकंपानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला हा पहिलाच मोठा भूकंप आहे. 2015 साली झालेल्या भूकंपात नेपाळमध्ये किमान 9 हजार जण मरण पावले होते आणि तब्बल 22 हजार लोक जखमी झाले होते.
एका पाठोपाठ एक भूकंपाचे धक्के !
काही दिवसांपूर्वी 16 ऑक्टोबरला नेपाळमधील सुदुरश्चिम प्रांताला 4.8 क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. राजधानी काठमांडूला 3 ऑक्टोबरला 3 क्षमतेचा आणि 22 ऑक्टोबरला 6.1 क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.
भारत आणि तिबेटच्या पठाराखालील भूस्तरांचे एकमेकांशी घर्षण झाल्यामुळे नेपाळला भूकंपाचे धक्के बसत असल्याचे वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ भारत कोईराला यांनी सांगितले. पूर्व नेपाळपेक्षा पश्चिम नेपाळ अधिक भूकंपप्रवण बनला असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी दिलीमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के !
शुक्रवारी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के राजधानी काठमांडूसह आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही जाणवले. याशिवाय नवी दिल्लीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काल रात्री झालेल्या भूकंपानंतर सुमारे 159 आफ्टरशॉक जाणवले आहेत,
असे नॅशनल अर्थक्वेक मॉनिटरींग ऍन्ड रिसर्च सेंटरने म्हटले आहे. पुन्हा भूकंप येण्याच्या भीतीमुळे शेकडो नागरिकांनी उघड्यावरच रात्र घालवली. पडलेल्या घरांच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांना सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू होते.
मोदींनी व्यक्त केले दुःख…
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेपाळमधील भूकंपात मरण पावणाऱ्या व्यक्तींबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच भूकंपात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.
नेपाळमधील भूकंपामुळे झालेली जीवित हानी आणि नुकसान यामुळे तीव्र दुःख झाले आहे. नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा आहे आणि शक्य असेल ती सर्व मदत करण्यासाठी सज्ज आहे, असे मोदींनी “एक्स’वरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.