सातारा -राज्य शासनाच्या “माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वसुंधरा दूत व पर्यावरण दूत उपक्रम दि. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक विविध स्पर्धा आयोजित केल्या असून शाळांमध्ये पर्यावरण व रक्षणाचे महत्व पटवून देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश या पंचतत्वावर आधारित “माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनी करण्यात आली असून अभियानामध्ये दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व ग्रामपंचायत व दहा हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती अशा दोन वर्गवारीमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग घेऊन निवड करण्यात येणार आहे.
एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत करण्यात येणाऱ्या कामाचे यामध्ये मूल्यमापन होणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील एक हजार 350 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे. आता हा उपक्रम शाळांमध्येही राबविण्यात येत असल्याचे गौडा यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत वृक्ष गणना, रोपवाटिकेची निर्मिती, जैवविविधता रजिस्टर, वृक्ष आराखडा, एकल वापर प्लॅस्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, ई- कचरा व्यवस्थापन, कृषी कचरा व्यवस्थापन (ग्रामीण), उज्ज्वला योजना आणि गॅस जोडणी (ग्रामीण), सायकलिंगकरिता मार्ग निर्मिती, इलक्ट्रिक वाहन धोरण 2021 ची प्रभावी अंमलबजावणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्स्थापना उपक्रम, ठिबक सिंचन ही या अभियानाची वैशिष्टये आहेत, असे गौडा यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी शाळा व महाविद्यालयात वसुंधरा दूत व पर्यावरण दूत उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाभरात वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. वसुंधरा दूत व पर्यावरण दूत उपक्रमात शाळा व महाविद्यालयांत हरित शपथ घेण्यात येणार आहे. पर्यावरण दूत व वसुंधरा दूतांची निवड केली जाणार आहे.
– अर्चना वाघमळे, (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)