मुंबई – एसटीने प्रवास केला तर त्याचे तिकीट हाच ई-पास समजला जाईल, असे राज्य सरकार सांगत आहे. मात्र, खासगी वाहनाने प्रवास केला तर ई-पास आवश्यक असल्याचेही सांगत आहे. मुळात सरकार काय जाहीर करते हेच समजेनासे झाले आहे. एकूणच ही ई-पासची प्रक्रिया हास्यास्पद ठरत आहे, असे सडेतोड मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
एसटीने प्रवास करत असलेल्यांना तिकीट हेच ई-पास असल्याचे सांगितल्यामुळे या ई-पासचे अस्तित्वच संपले आहे. त्यावर आता जनता विनोद व मिम्स तयार करत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या एकूणच प्रक्रियेचा विनोद झाला आहे. सरकारनेच या पासला निकालात काढले आहे.
राज्यातील अनलॉकबाबत सरकारने घेतलेले अनेक निर्णय संभ्रम निर्माण करणारे आहेत. त्यातही एकवाक्यता नाही. टप्प्याटप्प्याने मागे घेत असलेल्या अनलॉकबाबत केंद्राने काही निर्णय लागू केले आहेत. त्याची अनेक राज्यांमध्ये अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रात सरकार काय भूमिका घेत आहे हे देखील स्पष्ट होत नाही, असे गोंधळलेले सरकार ठोस निर्णय कधी घेणार, अशी विचारणाही त्यांनी केली.