मुंबई – ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष वेळेवर निश्चित करता येत नाही, ते विकास काय करणार तसेच भविष्यातील योजना तसेच पक्षाची भूमिका काय ठरवणार, अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस पक्षावर खोचक टीका केली आहे.
कॉंग्रेसच्या भावी अध्यक्षपदाबद्दल ज्या पद्धतीने पक्षाची बैठक झाली त्यावरून पक्षात सध्या गटातटाचे राजकारण सुरू आहे हे स्पष्ट दिसत आहे. ज्या पक्षाला वेळेवर अध्यक्ष निश्चित करता येत नाही त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा काय करणार? अध्यक्ष गांधी कुटुंबातीलच होणार होता तर मग चर्चा कशाला केल्या. त्यांच्या पक्षाचे अनेक नेते माध्यमांशी बोलताना जी काही मते व्यक्त करत होते तो एक विनोद होता.
अध्यक्षपदावरून जर त्यांच्यात इतकी मतभिन्नता असेल तर राज्यातील सरकारचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून पुढील काळात काय कामे होणार? पक्षाने सांगितले तर सरकारमधून बाहेर पडू असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या मताकडे फारसे गाभीर्याने पाहण्याची गरज नाही, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
तीन पक्षांचे कडबोळे असलेले हे सरकार फार काळ टीकेल असे वाटत नाही. तीन पक्षांची युती ही एक अनैसर्गिक आघाडी आहे व अशी सरकारे देशात फार काळ चालल्याची उदाहरणेही नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.