मुंबई – मातोश्री नावाचे दोन्ही बंगले अधिकृत आहेत का? वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? असे सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारून केंद्रीय मंत्री नारायण राणे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या टिकेवरून भलतेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
उद्धव ठाकरे खोटारडा माणूस आहे. यापुढे भाजप नेतृत्वावरील टीका सहन करणार नाही, असा इशाराही राणे यांनी ठाकरेंना दिला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राणे म्हणाले की, राज्याचे माजी निष्क्रिय मुख्यमंत्री हे काल ठाण्यात कुणाची तरी डिलिव्हरी करायला गेले होते. माझ्याकडे डॉक्टरचे सर्व कागदपत्रे असून डॉक्टरांनी त्यांना काही झाले नसल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंना चांगले बोलता येते का, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. त्यांनी राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी भाषा काल वापरली. तर मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुशांत, दीक्षा सालियान, यांना प्रकरणाचे काय झाले? असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला.
बाळासाहेबांशिवाय काय ओळख?
राणे यावेळी म्हणाले की, देशाबाहेरील शक्तीसोबत संबंध असलेल्या लोकांना मंत्री केले, त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा काही केले नाही. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही. बाळासाहेब असते तर हे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा त्याग करुन पद मिळवले. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या नावाशिवाय कुणी विचारत नाही, असाही घणाघात त्यांनी यावेळी केला.
करोना काळात पैसै खाल्ले
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे बघून कुणी शिवसेनेत प्रवेश केला का? मुख्यमंत्री असताना त्यांचे नेतृत्व कुणी स्वीकारले का?असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला. तर करोनाच्या काळात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून औषधींच्या प्रत्येक टेंडरमधून 15 टक्के पैसे घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.