पुणे – करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना दि.1 मार्चपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मार्चपासून आतापर्यंत राज्यभरात 24 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधितांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला तरच मदत दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात करोनाचा रुग्ण सापडल्यापासून चालू वर्षी दि. 3 एप्रिलपर्यंत एक लाख 48 हजार 445 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील 20 हजार 608 जणांचा समावेश आहे. करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधितांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू केली होती. ही योजना दि. 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू होती.
या कालावधीत एक लाख 48 हजार 421 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. संबंधितांच्या नातेवाईकांनी अर्ज केला असल्यास त्यांच्या अर्जांची छाननी करून अनुदान देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, दि.1 मार्चनंतर 24 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्या नातेवाइकांना मदत देण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. यांना मदत द्यायची असल्यास विद्यमान राज्य सरकारकडून निर्णय होणे आवश्यक आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.