नवी दिल्ली : देशात पुढील तीन आठवडे म्हणजे 21 दिवस संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ही एका प्रकारची संचारबंदीच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
कोरोनाला आपण पराभूत केले नाही तर आपण अनेक वर्ष मागे पडू, असा इशारा देत ते म्हणाले, हिंदुस्थानला वाचवण्यासाठी, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे,या काळात आपल्या घराबाहेर पडण्यास पूर्ण मनाई आहे. त्यामुळे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण आहात तेथेच रहा. आपण आपल्या घरात राहणे हे प्रत्येक घराच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. जर हे बंधन पाळले गेले नाही तर अनेक परिवार बरबाद होऊन जातील, असे ते म्हणाले.
मात्र देश २१ दिवस लॉक डाऊन राहणार असला तरी काही अत्यावश्यक सेवांना या बंदीतून वगळण्यात आलं आहे. केंद्र सरकारतर्फे याबाबत एका पत्रकाद्वारे बंदीतून वगळण्यात आलेल्या सेवांची माहिती देण्यात आली आहे.
बंदीतून वगळण्यात आलेल्या सेवा
1. बॅंका/ एटीएम, विमा आणि अन्य संबंधित सेवा
2. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
3. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
4. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
5. शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
6. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह आत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
7. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
8. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
9. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
10. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
11. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
12. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था
13. अत्यावश्यक सेवांना किंवा करोना प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने.
14. वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी