जयपूर: निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपला आमदारांचा घोडेबाजार करण्याची संधी मिळावी म्हणूनच ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असावी, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या प्रभावाखालीच हा निर्णय घेण्यात आला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. लोकशाहीसाठी हा अत्यंत दु:खद निर्णय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. करोनाच्या कारणाने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे दाखवण्यात आले असले तरी राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन हा निर्णय झालेला नाही.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या राज्यसभेच्या 55 जागांसाठी या निवडणुका 26 मार्चला होणार होत्या. त्यातील 37 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरित जागांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या. तथापि, पुढील नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. राजस्थानातून राज्यसभेच्या तीन जागांसाठी येत्या गुरुवारी मतदान होणार होते.