मंचर – सुलतानपूर बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने मंचर शहराचा पाणीपुरवठा सोमवारीपासून (दि. 24) ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे.
सुलतानपूर गावातून घोडनदी वाहते. घोडनदीपात्रात मंचरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर आहे. त्या विहिरीनजीक घोडनदी पात्रात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून पाण्याची साठवण क्षमता निर्माण केली आहे. तेथील विहिरीद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो. पंधरा दिवसांपासून बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी होत आहे. सद्य परिस्थितीत विहिरीच्या तळात बंधाऱ्यातील पाणी घेणारा पाइप उघडा पडला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सोमवारी दवंडी देऊन पाणीपुरवठा होणार नसल्याचे सांगितले.
वडगाव काशिंबेग गावानजीक असणाऱ्या पद्मावती डोहातून मोटारीद्वारे पाणी उपसा करुन पात्रातून सुमारे एक किलोमीटर पाणी वाहत येऊन विहिरीच्या तळाशी त्या पाण्याची साठवणूक केली जाणार आहे. पाण्याची साठवणूक होण्यासाठी अवधी लागणार आहे. मंचरला दैनंदिन 40 लाख लीटर पाणी लागत आहे. पुरेसा पाऊस झाल्यावर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सरपंच गांजाळे यांनी दिली.