मुंबई – ‘जस्ट चिल धोंडू’ या डायलॉगने प्रसिद्ध झालेले अभिनेता संजय मिश्रा हे एक अफलातून कॉमेडी अभिनेता आहेत. मिश्रा यांनी कॉमेडीसह विविध प्रकारचे दर्जेदार रोल केले आहेत. आतपर्यंत एकूण १५० हुन अधिक चित्रपट करणारे मिश्रा इंडस्ट्री सोडून जाणार होते. त्यासाठी ते मुंबई सोडून देखील गेले होते. परंतु दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्यांना पुन्हा आणल्याचे समजते.
नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून पासआउट झाल्यानंतर संजय मिश्रा यांनी छोट्या पडद्यावर आपले नशीब आजमावले आणि त्यानंतर ते मोठ्या पडद्याकडे वळले. इंडस्ट्रीत चांगले नाव कमावल्यानंतर एके दिवशी अचानक संजय मिश्राने इंडस्ट्रीला राम राम केला आणि ढाब्यावर काम करायला सुरुवात केली. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संजय यांना हे काम करावे लागले. वडिलांच्या मृत्यूमुळे ते इतके खचले होते की पुन्हा इंडस्ट्रीचा विचार देखील करू शकत नव्हते. म्हणून हृषीकेश येथील एका ढाब्यावर संजय मिश्रा आपले काम करत होते.
यावेळी रोहित शेट्टी ‘ऑल द बेस्ट’ चित्रपट बनवत होते. एका भूमिकेसाठी त्यांना संजय मिश्राची आठवण झाली. सुरुवातीला संजय मिश्राने नकार दिला, पण नंतर रोहित शेट्टीने त्यांना मनवलेच आणि मिश्रा यांची परत इंडस्ट्रीमध्ये इंट्री झाली. यानंतर संजय मिश्रा यांनी मागे वळून पाहिले नाही.